नेयवेली (तामीळनाडू), दि. 1 – एनएलसी इंडियाच्या औष्णिक उर्जा प्रकल्पातील बॉयलरचा बुधवारी स्फोट होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. तर अन्य 16 जण जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांच्याशी चर्चा केली असून शक्य ती सर्व मदत करण्याची हमी दिली आहे.
घटनास्थळावरील प्राथमिक माहितीनुसार स्फोटामध्ये दोघेजण मरण पावले होते. मात्र थोड्याच वेळात मृतांची संख्या वाढून 6 झाल्याचे एनएलसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जखमींना चेन्नईमधील रुग्णालयात हलवण्यात आले आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मरण पावणारे सर्वजण 25 ते 42 वर्षे वयोगटातील होते. हे सर्वजण कंत्राटी कामगार होते. जखमी झालेले कर्मचारी किमान 40 टक्के भाजले असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये म्हटले आहे.
ही घटना औष्णिक उर्जा प्रकल्पातील स्टेशन 2 मधील पाचव्या युनिटमध्ये कामगार कामाला सुरुवात करत असतानाच घडली.