जेव्हा आपण तासन्तास एकाच जागी एकाच पद्धतीत बसून एकाच हाताने काम करतो, त्याचा परिणाम मानेच्या मणक्यावर व्हायला सुरुवात होते. कामाच्या व्यापात, तणावाच्या ओघात आपण किती वेळ कसे बसलो आहोत, याकडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही.
बऱ्याचदा आपण काम करताना नकळतपणे एका बाजूस झुकलेले असतो. याचा परिणाम टप्प्याटप्प्याने मान आणि हाताच्या स्नायूंपासून ते मणक्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर होऊ लागतो.
मानेच्या एका बाजूचे स्नायू ओढले जाऊन दुसऱ्या बाजूचे स्नायू आखडले जातात. हळूहळू मणक्याच्या नैसर्गिक रचनेमध्ये बदल होण्यास सुरुवात होते. दोन मणक्यामधील अंतर कमी होऊ लागते. त्यामुळे मणक्यातून बाहेर पडणाऱ्या नसांवर अधिक दाब येऊ लागतो. एका बाजूची नस दबली जाते तर दुसऱ्या बाजूची ओढली जाते. त्यामुळे लक्षणांची तीव्रता समजून घेण्याकरीता काही तपासण्या कराव्यात.
व्यक्तीच्या शरीराची ढब, त्याची चालण्याची पद्धत अशा लक्षणांचा सखोल अभ्यास करून शरीर आणि मन याचा योग्य समन्वय राखून बॉडी ऍन्ड माईंड इक्विलिब्रियम पध्दतीने अशा प्रकारच्या तक्रारींवर मात करता येते. शरीराचा ढळलेला तराजू पूर्वस्थितीत येण्यासाठी काही वैयक्तिक शारीरिक स्थिति (पोश्चर थेरपी ) देऊन रुग्णाच्या तक्रारी कमी करता येतात.
प्रत्येक व्यक्ती भिन्न आहे, वेगळ्या वातावरणात वाढलेली असते, प्रत्येकाची जडण घडण वेगळी असते. शारीरिक आणि मानसिक ताण तणाव वेगवेगळे असतात. म्हणूनच एकाच प्रकारचा त्रास असला तरी देखील प्रत्येक व्यक्तीनुरूप उपचार होणे गरजेचे असते. उपचार करून झाल्यावर ते टिकवून ठेवण्यासाठी असणारे व्यायाम देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.
या वैयक्तिक विशिष्ट शारिरीक स्थितींमुळे शरीराचा आखडलेपणा कमी होतो.
सांधे मोकळे होतात. हळूहळू नसांवरचा दाब कमी होऊन मणक्यात दबलेली नस मोकळी होण्यास मदत होते. यासाठी लागणारा वेळ किंवा आजार पूर्ण कमी करता येईल की नाही, या गोष्टी त्या व्यक्तीवर, त्याच्या लक्षणांच्या तीव्रतेवर आणि सातत्यावर अवलंबून असतात. रुग्णाची अवस्था पूर्ण बरे होण्यासारखी नसल्यास किमान त्याची दैनंदिन कामे त्याला काही अंशी सुरळीत करता येतील याकरीता निश्चित मदत होते.
होमिओपॅथीक औषधोपचारांद्वारेही या प्रकारच्या तक्रारींचे निवारण होण्यासाठी मदत घेता येते. होमिओपॅथीक औषधे देताना रुग्णाचा त्रास नेमका कधी वाढतो, कोणत्या स्थितीत कमी होतो, दिवसभरात लक्षणांची तीव्रता कमी अधिक केव्हा होते, वेदना कोणत्या प्रकारे होते तसेच रुग्णाची मानसिकता होमिओपॅथी उपचार पद्धतीत विचारात घेतली जाते. या सर्व गोष्टींचा अचूक अभ्यास करून योग्य मात्रेत औषधे दिली जातात. यामुळे निश्चितच अपेक्षित परिणाम दिसून येतो.
वर म्हटल्याप्रमाणे उपचारांनी आलेला परिणाम टिकवून ठेवण्यासाठी आपल्या रोजच्या सवयींमध्ये काही साधे सोपे बदल स्वीकारून अंगवळणी करून घेणे आवश्यक आहे. काही वेळा मात्र या गोष्टी व्यक्तीनुरूप बदलू शकतात. कामाच्या स्वरुपानुसार कोणत्या गोष्टीचा शरीरावर कसा परिणाम होत आहे हे समजून घेऊन त्यानुसार कोणते बदल करायचे हे सांगणे इष्ट ठरेल.
बराच वेळ एका जागी बसून काम करण्याची जीवनशैली सध्या आपल्याला अंगवळणी करून घ्यावी लागणार आहे. मग ही बसण्याची योग्य पद्धत कोणती असते हे समजले तर लहान मुलांपासून ते ज्येष्ठांमध्ये पुढे येणाऱ्या संभाव्य तक्रारी आपल्याला टाळता येतील. त्याबाबतची माहिती आपण याच मालिकेतील पुढच्या लेखात घेऊया.