गाझीपूर, दि. 11 – उत्तरप्रदेशच्या गाझीपूर जिल्ह्यात गंगानदीच्या किनारीही आज मोठ्या प्रमाणात मानवी मृतदेह आढळून आल्याने तेथेही मोठी खळबळ उडाली आहे. काल बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील चौसा गावी गंगा नदीच्या पात्रात शंभराच्यावर मृतदेह आढळून आले होते. त्या ठिकाणापासून 55 किमी अंतरावर उत्तरप्रदेशात आज लागोपाठ दुसऱ्यादिवशी हा प्रकार आढळून आला आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे या विषयी तक्रार दिली पण प्रशासनाकडून अजून कोणतीही हालचाल झाली नाही अशी गावकऱ्यांची तक्रार आहे. तथापि गाझीपूरचे जिल्हा दंडाधिकारी एमपी सिंह यांनी सांगितले की, आमचे अधिकारी घटनास्थळाची माहिती घेण्यासाठी रवाना झाले असून या प्रकाराची चौकशी केली जात आहे. तेथे नेमके किती मृतदेह आढळून आले आहेत याची माहिती घेतली जात आहे असे ते म्हणाले.
सरकारी अनास्थेमुळे हे मृतदेह पाण्यातच सडून गेले तर येथील पाणी दूषित होईल आणि गावकऱ्यांमध्येही करोनाचा कहर निर्माण होईल अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान बक्सर जिल्ह्यातील नदीत आढळून आलेले बहुतेक मृतदेह बाहेर काढण्यात आले असून त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तेथील मृतदेहांची संख्या शंभरहून अधिक होती व गेले पाच ते सात दिवस हे मृतदेह या पाण्यात होते त्यामुळे मृतदेहांची स्थिती अत्यंत खराब झाली होती.
नदीत मोठ्या प्रमाणात सापडत असलेले हे मृतदेह करोना रुग्णांचेच आहेत. तथापि त्यांच्यावरील अत्यंसंस्काराचा खर्च परवडत नसल्याने किंवा त्यासाठी जागाच मिळत नसल्याने लोकांनी हे मृतदेह गंगेला अर्पण केले असावेत अशी शंका व्यक्त केली जात आहे.