ना. थोरात ः संगमनेर फेस्टिव्हलमध्ये उलगडला विकासाचा प्लॅन
संगमनेर (प्रतिनिधी) – पक्षाशी सतत निष्ठा ठेवून काम करीत राहिल्याने आमदारकीपासून अगदी प्रदेशाध्यक्षापर्यंतचा प्रवास घडला. मात्र त्यापेक्षा या सगळ्या पदांचा वापर करुन निळवंडे धरणाचे काम पूर्णत्वाला नेता आले, याचे मनस्वी समाधान लाभले. ज्या दिवशी धरणाचे पाणी कालव्यांद्वारे दुष्काळीभागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, तो दिवस जीवनातील सर्वोच्च आनंद देणारा ठरेल, असे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
येथील राजस्थान युवक मंडळ व मालपाणी उद्योग समूहाच्यावतीने यंदा संगमनेर फेस्टिव्हलच्या डिजिटल मंचावर ना. थोरात यांची चतुरस्त्र मुलाखत घेण्यात आली. रचना मालपाणी व डॉ. संतोष खेडलेकर यांनी विविध प्रश्नांतून त्यांच्या आजवरच्या वाटचालीचा वेध घेतला. जवळपास तासभर चाललेल्या या मुलाखतीतून ना. थोरात यांच्या जीवनातील विविध पैलूंवर झोत पडला. ना. थोरात म्हणाले, बालपणापासून गांधीजींच्या विचारांची शिकवण मिळाल्याने आपण कायम कॉंग्रेस पक्षाच्या विचारांशी एकनिष्ठ राहिलो.
लोकाग्रहास्तव 1985 साली पहिल्यांदा निवडणूक लढविली आणि संगमनेरकरांच्या प्रेमाने त्यात घवघवीत यशही संपादन केले. तेव्हापासून तालुक्यातील जनतेचे प्रेम सातत्याने मिळाल्याने सलग आठवेळा प्रचंड विजय प्राप्त केला. या काळात पक्षाने राज्याची जबाबदारीही सोपविल्याने चांगले काम करण्याची संधी मिळाली. विविध विकास योजना तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत नेण्याचे काम करता आले. गेल्या अनेक दशकांपासून केवळ चर्चेत असणाऱ्या निळवंडे धरणाच्या कामाला गती देण्याचे व ते पूर्णत्त्वास नेण्याचे कार्य आपल्या हातून घडले, हा जीवनातील सर्वांत मोठा प्रसंग आहे.
पुढील दोन वर्षांत या धरणाच्या कालव्यांची कामे तडीस नेवून दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी पोहोचवण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. ज्या दिवशी ते पूर्ण होईल तो दिवस आपल्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण असेल, असे भावोद्गारही त्यांनी व्यक्त केले. नाशिक-पुणे लोहमार्गासाठी निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच या प्रकल्पाचे काम सुरु होवून ते विक्रमी वेळेत पूर्ण होणार आहे. संगमनेर फेस्टिव्हलचे अध्यक्ष मनीष मालपाणी यांनी प्रास्तविकात फेस्टिव्हलचा गेल्या बारा वर्षांचा आढावा घेतला. यावर्षी कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गणेशोत्सव सार्वजनिक पातळीवर साजरा करण्यास प्रतिबंध असल्याने यंदाचा संगमनेर फेस्टिव्हल डिजिटल माध्यमाद्वारे सादर होत असल्याचे ते म्हणाले.
पक्ष नेतृत्वाचा विश्वास सार्थ ठरविला
पक्ष अडचणीच्या काळात असतांना पक्ष नेतृत्वाने राज्याच्या नेतृत्वाची धुरा सोपवली. जनतेच्या आशीर्वादाने तेथेही चांगले काम घडल्याने अनपेक्षित वाटणारे निकाल आपल्या सर्वांसमोर आल्याचे त्यांनी सांगीतले. प्रत्येक अभिमान वाटावा, असेच काम आजवर केले आहे व यापुढेही करीत राहणार असल्याची ग्वाहीही यावेळी ना. बाळासाहेब थोरात यांनी दिली.