कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांना आपल्याकडे घेऊन कडवी झुंज देणाऱ्या भाजपची स्थिती आता बिकट होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकूल रॉय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यांनतर भाजपमधील २४ हुन अधिक आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती.
यातच आता २०० कार्यकर्त्यांनी भाजपामधून बाहेर पडत पुन्हा एकदा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हुगळी जिल्यात कार्यकर्त्यांनी गंगाजलने शुद्धीकरण करत भाजपामध्ये प्रवेश करणं आपली खूप मोठी चूक होती असं म्हणत TMCमध्ये प्रवेश घेतला आहे.
TMCमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या कार्यकर्त्यांनी मुंडन करून घेत स्वःताच्या अंगावर गंगाजल शिंपडून शुद्धीकरण केलं आणि त्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
दरम्यान, भाजपाने विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात झालेल्या हिंसाचारामुळे कार्यकर्ते पुन्हा टीएमसीमध्ये जात असल्याचा दावा केला आहे. आपल्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेची भीती असल्याने कार्यकर्ते भीतीपोटी प्रवेश करत असून त्यांच्यावर जबरदस्ती केली जात असल्याचं भाजपाने म्हटलं आहे.