मुंबई – करोना व्हायरसमुळे ताडदेवमधील राज राजेश्वरी प्रतिष्ठानने चैत्र नवरात्रोत्सव रद्द करत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मुख्य म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत या रक्तदान शिबिराचे आयोजन मंडळाने केले होते.
राज्यात काही दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उरलेला असुन या अनुषंघाने जसलोक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जमावबंदी आणि लॉकडाऊनची एकंदर परिस्थिती पाहता सोशल डिस्टन्सिंग टाळण्यासाठी राजराजेश्वरी प्रतिष्ठान न्यासने एक स्तुत्य कल्पना अंमलात आणली.
यात कोणत्याही नागरिकाला रक्तदान करावयाचे असल्यास त्यांनी मंडळाशी संपर्क करणे आवश्यक होते. त्यानंतर मंडळाकडून त्यांना एक निश्चित अशी वेळी देण्यात येत होती. यामुळे एकमेकांशी होणारा संपर्क टाळण सहज शक्य झाले. या शिबिराला दिवसभरात उत्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, दरवर्षी मराठी नववर्षापासून चैत्र नवरात्रोत्सवाला सुरुवात होते. करोनामुळे यंदा मंडळाने फक्त देवीची स्थापना केली असून देवीच्या दर्शनाची रांग बंद करण्यात आली. फक्त देवीचे पुजारी नित्यनियमीतपणे पुजा-अर्चा करतात. यंदा मंडळाने सामाजिक भान राखत कोणताही उत्सव, सार्वजनिक उपक्रम न करता फक्त रक्तदानाचे आयोजन केले आहे.