नगर – करोना व सारी या महामारीच्या काळात सध्या सर्वच रुग्णालयात रक्ताचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. अशा काळात श्री परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रक्तदान शिबिराचा उपक्रम समाजाला नवी दिशा व बळ देणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
परशुराम प्रतिष्ठानच्यावतीने श्री भगवान परशुरामांच्या जयंतीनिमित्त जनकल्याण रक्तपेढी येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आ. जगताप बोलत होते. जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. संदीप अनुभुले, फाटके हॉस्पिटलचे डॉ. सतीश फाटके, डॉ. अंजली फाटके, परशुराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशपांडे, प्रसाद पुंडे, निखिल देशपांडे, सुमित कुलकर्णी, अमित गटणे, मंगेश निसळ, प्रसन्न जोशी, निनाद देव, नरेंद्र जोशी, दीनेश जोशी, संजय मनवेलीकर, अतुल शुक्ल, ऋषिकेश देशमुख आदी उपस्थित होते.
आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते श्री भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार घालून या रक्तदान शिबिराचे उद्घाटन झाले. यावेळी भगवान परशुरामांची आरती करण्यात आली. जनकल्याण रक्तपेढी व श्री परशुराम प्रतिष्ठानच्या वतीने आ. संग्राम जगताप यांचा सत्कार करण्यात आला. करोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांनी आपापल्या घरात राहूनच भगवान परशुरामांची जयंती साजरी केली. शनिवारी दुपारी प्रत्येक घरामध्ये भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली. रात्री 7:30 वा. घरोघरी दिवे लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनकल्याण रक्तपेढी येथे 2 दिवसीय रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 2 दिवसाच्या काळात 80 रक्तदाते रक्तदान करणार आहेत. लॉक डाऊनच्या सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हे रक्तदान शिबिर होणार आहे असे, विजय देशपांडे यांनी सांगितले.