पुसेगाव (प्रकाश राजेघाटगे) – विज्ञानामुळे कितीही क्रांती झाली असली तरी पृथ्वीतलावर अजूनही कृत्रिम रक्ताची निर्मिती शक्य झालेली नाही. त्यामुळे रक्तदान हाच एकमेव पर्याय सद्य स्थितीत उपलब्ध आहे. रक्तस्रावानंतर तात्काळ रक्तपुरवठा झाला नाही, तर रुग्णाचा जीव जाण्याची शक्यता शतपटीने वाढते. करोना काळात रक्तदानाचे महत्त्व अनन्यसाधारण झाले आहे.
या कठीण काळात काही संघटना व संस्था त्यासाठी काम करत आहेत; परंतु एखाद्या मंगल प्रसंगात समाजापुढे आदर्श निर्माण करणारे व माणुसकीचे दर्शन घडवणारे निर्णय घेतले जातात. असाच निर्णय राजापूर, ता. खटाव येथील माजी सरपंच राजेंद्र राजेघाटगे यांनी घेतला. त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात चक्क लग्नमंडपात रक्तदान करण्यात आले. वधू पक्षाच्या या निर्णयाला वर पक्षानेही साथ दिली. यावेळी 80 जणांनी रक्तदान केले. वर-वधू पक्षांनी जपलेले सामाजिक भान व रक्तदानाचे कौतुक सोशल मीडियावरूनही होत आहे.
राजापूरचे माजी सरपंच राजेंद्र राजेघाटगे यांची कन्या रूपालीचा विवाह सासवड येथील हनुमंतराव जगताप-देशमुख यांचे सुपुत्र अविनाश यांच्याशी सुरवडी येथील रॉयल पॅलेस या कार्यालयात झाला. दोन्ही कुटुंबांना सामाजिक कार्याची आवड असल्याने लग्नाच्या दिवशी रक्तदानाचा कार्यक्रम लग्नमंडपी आयोजित केला होता.
करोना काळात रक्तपेढ्यांमधील रक्तसाठा कमी झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला रक्तदानाचे आवाहन केले होते. त्याचे स्मरण ठेवून दोन्ही कुटुंबांनी विवाह सोहळ्यातच रक्तदान शिबिर घेतले.
यावेळी उपस्थित असलेले आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, पुसेगावच्या सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन मोहनराव जाधव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, विठ्ठलराव फडतरे, मानाजी घाडगे,अशोकराव गोडसे, माजी सरपंच बाळासाहेब इंगळे, माजी उपसभापती कैलास घाडगे, सरपंच शिवाजी शेडगे, डॉ. विश्वास इनामदार यांनी या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले.