-आनंद गावरस्कर
विश्वचषक स्पर्धा ही क्रिकेट मधील सर्वात महात्वाची स्पर्धा समजली जाते. त्यामुळे या स्पर्धेत कोणताही देश आपला परिपुर्ण संघ उतरवत असतो. ज्यात केवळ चांगले गोलंदाज अथवा चांगले फलंदाज न उतरवता सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू देखील मैदानात उतरवले जातात. ज्या संघातील अष्टपैलू खेळाडू चांगली कामगिरी करतील तो संघ या स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रमुख दावेदार ठरतो याचा प्रत्यय 1983, 1987, 1992, 1996 आणि 2011च्या विश्वचषक स्पर्धेत आला होता.
1983 सालचा विश्वचषक भारतीय संघाने कर्णधार कपिल देव यांच्या अष्टपैलू खेळाने जिंकला होता. या स्पर्धेत कपिल देवने झिम्बाब्वे संघाविरुद्ध नाबाद 175 धावांची तडाखेबाज खेळी त्याने साकारलीच होती. मात्र, वेस्ट इंडिजच्या संघातील तगड्या फलंदाजांना आपल्या वेगा समोर नतमस्तक व्हायला भाग पाडत त्याने स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. खर तर या स्पर्धेनंतरच प्रत्येक संघाने आपल्याकडे अष्टपैलू खेळाडू असावा आणि त्याने चांगली कामगिरी करावी याकडे विशेष लक्ष दिले होते.
त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघाने 1987च्या विश्वचषक स्पर्धेत 2 ते 3 अष्टपैलू खेळाडूंना संघात सहभागी करुन घेतले होते. त्या खेळाडूंनी संपुर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या पावलावर पाऊल ठेवत पाकिस्तानच्या संघाने आपल्या संघाचे नेतृत्व एका अष्टपैलू खेळाडूच्या हाती दिले ज्याचे नाव होते इम्रान खान.
इम्रान खानने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीच्या बळावर पाकिस्तानला विश्वचषक पटकावून देण्यात महत्वाची भुमिका बजावली होती. इम्रान खानने जी भुमिका पाकिस्तानच्या संघासाठी निभावली तिच भुमिका श्रीलंकेच्या सनथ जयसुर्याने त्यांच्या संघासाठी निभावताना 96 सालच्या स्पर्धेत श्रीलंकेला विश्वविजेतेपद पटकावून दिले होते.
मात्र, यानंतर थेट 2011 सालच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघातील युवराज सिंगने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर भारताच्या विश्वचषक विजयात मोलाची भुमिका निभावली होती.
आता यंदाची स्पर्धा देखील सुरूवातीपासुनच अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीनेच गाजताना दिसुन येत आहे. बेन स्टोक्स, शाकिब अल हसन, आंद्रे रसेल हे खेळाडूही त्यांच्या संघांना मिळवून दिलेल्या विजयातूनच पुढे आले आहेत.