नवी दिल्ली –बिहारमध्ये मागील विधानसभा निवडणुकीवेळी (2015) बेहिशेबी रोकड, दारू आणि इतर मुद्देमाल मिळून सुमारे 24 कोटी रूपयांची जप्ती करण्यात आली होती. यावेळच्या निवडणुकीत आताच मागील वेळच्या जप्तीच्या रकमेचा आकडा ओलांडला गेला आहे. त्यामुळे बिहार निवडणुकीत यंदा काळ्या पैशांचा सुळसुळाट वाढल्याचे चित्र समोर आले आहे.
निवडणुकांमध्ये मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवली जात असल्याची बाब नवी राहिलेली नाही. मतदारांना रोख रक्कम, भेटवस्तू, दारू देण्याच्या घटना नित्याच्याच आहेत. तशाप्रकारच्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाकडून उपाययोजना केल्या जातात.
बिहारमध्येही आयोगाने यावेळी निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी पथके नियुक्त केली आहेत. त्या पथकांनी आतापर्यंत 35 कोटी रूपयांहून अधिक मुल्याची रोकड, दारू आणि इतर मुद्देमालाची जप्ती केली. त्याशिवाय, सुमारे 80 लाख रूपये मुल्याचे नेपाळी चलनही हस्तगत केले.
बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक खर्चावर देखरेख ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने 67 निरीक्षक आणि 2 विशेष निरीक्षकांना नेमले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली 881 फिरती पथके आणि 948 स्थिर पथके खर्चावर देखरेख ठेवणार आहेत.