मुंबई – करोनापासून सुरक्षित राहण्यासाठी सध्या एन-95 मास्क हा उपाय फायदेशीर ठरत आहे. यामुळे या मास्कची मागणी वाढत असल्याने नफेखोरांनी याच्या दरात अव्वाच्या सव्वा वाढ केली आहे. या एन-95 मास्कच्या किंमतीत 4 महिन्यात तब्बल पाच पटींनी वाढ झाली आहे. मात्र, यावर प्रशासनाला नियंत्रण ठेवता न आल्याने त्याचा काळाबाजार दिवसेंदिवस वाढत आहे.
देशासह राज्यात चार महिन्यांपासून करोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. या विषाणूपासून वाचण्यासाठी अनेक उपाययोजना सांगितल्या जात आहेत. यामध्ये स्वच्छतेसोबत आपल्या चेहरा झाकण्यासाठी एन-95 मास्क गरजेचा असल्याचेही सांगण्यात आले आहे. संपूर्ण जगभरामध्ये करोनाने घातलेला धुमाकूळ पाहिल्यानंतर मास्क किती महत्वाचा आहे, याची जाणीव झाल्यानंतर या मास्कची निर्मिती करणाऱ्या उद्योजकांनी मास्कची किंमत अव्वाच्या सव्वा वाढवली.
शासनाला सप्टेंबर 2019 ला एन-95 मास्क 12 रुपये 25 पैशांना उपलब्ध होत होते. तर जानेवारी 2020 मध्ये हेच मास्क 17 रुपये 33 पैशांना मिळू लागले आणि मार्चच्या अखेरीस 42 रुपयांना हे मास्क मिळू लागले. त्यानंतर मे महिन्याच्या मध्यावधीला 63 रुपयांना हे मास्क उपलब्ध झाले. यावरून जानेवारीच्या सुरुवातीपासून मास्कच्या खरेदीमध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यांमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
भारतीयांची गरज ओळखून सध्याच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात एन-95 मास्कची निर्मिती केलेली आहे. मात्र, हे मास्क योग्य दरामध्ये शेवटच्या ग्राहकांपर्यंत पोहोचत नाहीत. वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे दर असल्यामुळे नागरिकांना हे मास्क घेणे सध्या परवडत नाही. तसेच काही ठिकाणी या मास्कचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ते उपलब्ध होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेवर शासनाने आपले लक्ष केंद्रित करावे आणि या मास्कच्या मागून जो काळा बाजार सुरू आहे याच्यावर नियंत्रण आणावी, अशी मागणी होत आहे.