मुंबई: राज्यात पावसाने रौद्र रूप धारण करत अनेकांचे संसार उद्धवस्त केले आहेत. कोकणात तर पावसाने अक्षरशः तांडव केला, दरम्यान राज्यातील या संकटाच्या मालिकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या घरी काळा जादू चालत असल्याचा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
महाडच्या तळीये आणि साताऱ्यातील आंबेघर येथे दरड कोसळून प्रचंड जीवितहानी झाली. तर चिपळूण, महाड, कोल्हापूर आणि सांगलीला पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. महाराष्ट्रावर एकामागून एक संकटाची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी खोचक ट्विट करतानाच मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोपही केला आहे.
स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो..
तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून २८ नोव्हेंबर २०१९ ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल !!— nitesh rane (@NiteshNRane) July 24, 2021
“स्वतःचे मुख्यमंत्री पद वाचवण्यासाठी काळा जादू आणि पूजा मुख्यमंत्री स्वतःच्या घरी करत असतात असे आम्ही ऐकतो. तशीच आता एकदा महाराष्ट्राला शांत करण्यासाठी महापूजा करावी, जेणेकरून 28 नोव्हेंबर 2019 ला लागलेली पणवती एकदाचीच काय ती दूर होईल,” असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.
नितेश राणे यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये थेट मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, सरकारकडून या नागरिकांसाठी खूप उशिराने मदत मिळाली आहे. त्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.
आम्ही घटनास्थळी दाखल झालो असता सरकारकडून कोणतीही मदत मिळत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले. पुरातून बाहेर काढण्यासाठी बोटी पाठवण्यात आल्या नाहीत. अधिकारी नेटवर्कमध्ये नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या मंत्र्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राणे यांनी केली आहे.