औरंगाबाद – करोना संसर्गाने हाहाकार माजवला असतानाच आता ब्लॅक फंगस (म्यूकरमायकोसिस)चाही धोका वाढत आहे. औरंगाबाद शहरातील तब्बल 201 जणांना या काळ्या बुरशीचा संसर्ग झाला असून यापैकी 16 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबाद महानगरपालिकेकडून यासंदर्भात माहिती देण्यात आलीय.
तज्ञांची कोअर कमिटी तयार –
काळ्या बुरशीचा संसर्ग झालेले बहुतांश लोक हे मधुमेहाचे रुग्ण असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. ब्लॅक फंगसचे बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून डेटा एकत्रित करण्याचे काम सुरु आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. नीता पडळकर यांनी सांगितले की, कोविडच्या काळात म्यूकरमायकोसिस चा सामना करण्यासाठी तज्ञांची कोअर कमिटी तयार करण्यात आली आहे. कमिटीमध्ये सरकारी आणि खासगी क्षेत्रातील ईएनटी तज्ज्ञ, दंतवैद्य आणि नेत्रतज्ज्ञांचा समावेश आहे. हे विशेषज्ञ गंभीर प्रकरणांमध्ये म्यूकरमायकोसिसच्या उपचारांविषयी मार्गदर्शन करतील.
स्टेराॅइडच्या वापरामुळे धोका अधिक –
डाॅ. पडळकर यांनी म्हटेल की, कोविड रूग्ण ज्यांना मधुमेह आहे अशा रुग्णांमध्ये स्टेराॅईडचा वापर झाल्याने म्यूकरमायकोसिसचा धोका अधिक वाढत आहे. या रोगाचा वेगाने प्रसार होण्याचे हेच मुख्य कारण आहे. सरकारने मधुमेहग्रस्त कोविड रुग्णांसाठी विशेष मार्गदर्शक सुचना जारी कराव्यात अशी आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.