मुंबई – मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी एटीएसनंतर आता एनआयएकडून मुंबई पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून सेवेत असलेले सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यात आला. शनिवारी रात्री वाझेंना अटक करण्यात आली असून आज त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली. यावरून राज्याचं राजकारण तापलं असून विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आहे. त्यांच्या आक्रमकतेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
अंबानी कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी वाझेंना भाजपने खलनायक बनवल्याचा दावा नाना पटोले यांनी केला आहे.
महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी सचिन वाझेला खलनायक ठरवण्याचं काम भाजपकडून करण्यात आलेलं आहे. अंबानीच्या घरापासून ती गाडी लांब सापडली होती. त्यामध्ये स्फोटक नसल्याचंही समोर आलेलं आहे. केवळ अंबानी कुटुंबाला झेड प्लस सुरक्षेसाठी आणि त्यांच्या घरावर हेलिकॉप्टर परवानगी मिळावी यासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.