पिंपरी – राज्यात आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत अवघी पाच वर्षे सत्ता मिळाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शहरातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांवर पदांची अक्षरश: लयलूट केली. सध्या राज्यात सत्ता नसतानाही शहरातील उमा खापरे यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली. त्या तुलनेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीकडून मात्र शहरातील नेत्यांना सातत्याने डावलण्यात आले आहे.
शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आपल्या अन्याय होत असल्याची भावना वाढत असतानाच भाजपने पुन्हा उमा खापरे यांना विधानपरिषदेसाठी संधी देत राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मनातील खदखदीचा फटका महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सन 2014 साली राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर पिंपरी-चिंचवडमधील भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाही देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मोठे बळ देण्यात आले होते. एकाचवेळी दोघांना राज्यमंत्री दर्जाची पदे शहरातील कार्यकर्त्यांना देण्यात आली. यामध्ये लोकलेखा समितीचे अध्यक्षपद सचिन पटवर्धन यांच्याकडे आले होते तर तब्बल तीन हजार कोटींचे बजेट असलेल्या महामंडळाचे अध्यक्षपद अमित गोरखे यांना देण्यात आले होते. त्याच दरम्यान अमर साबळे यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली होती. तर सदाशिव खाडे यांच्यासारख्या सर्वसामान्य कार्यक़र्त्याला पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्षपद बहाल केले होते.
केवळ पाच वर्षांच्या सत्ताकाळात एवढी मोठी पदे बहाल केलेली असताना आता सत्ता नसतानाही उमा खापरे यांना थेट विधानपरिषदेची संधी देत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना फक्त आम्हीच बळ देऊ शकतो, हा संदेश भाजपने दिला आहे. खापरे यांना दिलेल्या संधीमुळे इतर पक्षांमधील बलाढ्य नेत्यांच्या सुद्धा भुवया उंचावल्या आहेत. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमधील एका सर्वसामान्य कार्यकर्तीला दिलेली ताकद ही कौतुकास्पद बाब बनली आहे. मात्र यामुळे इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांना काय मिळाले? याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थापनेपासून सातत्याने हा पक्ष सत्तेत आहे. राज्यातील पाच वर्षे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पाच वर्षे वगळता राज्यात आणि महापालिकेत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीतील नेत्यांकडे मात्र राज्यस्तरावरून दुर्लक्ष झाले ही बाब उमा खापरे यांच्या उमेदवारीने अधोरेखित झाली आहे. राष्ट्रवादीकडे प्रचंड ताकदीचे नेते असतानाही त्यांना केवळ डावलण्याचाच प्रकार पक्षाकडून झाल्याने ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ही खदखद बाहेर पडण्याची शक्यता आहे.
वाऱ्याची दिशा ओळखणाऱ्यांचे भले
सन 2014 साली वाऱ्याची दिशा ओळखणाऱ्या आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांचे भाजपच्या वळचणीला गेल्यामुळे कल्याणच झाले. सुरुवातीला राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक वल्गणा केल्या मात्र त्यांच्याविरोधात कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यावरच आपल्याला संधी मिळणार का? अशीही चर्चा रंगू लागली आहे.
प्रमाणिक नेत्यांचा विचार होणार का?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आझम पानसरे, कै. नानासाहेब शितोळे यांनी आपले संपूर्ण आयुष्य पक्षासाठी दिले. मात्र या नेत्यांना पक्षाने काय दिले? याचा लेखाजोखा आता मांडला जावू लागला आहे. सलग सहावेळा निवडून आलेले योगेश बहल हे पंजाबी असतानाही बहुजनांचे नेतृत्त्व करतात. मात्र त्यांनाही सातत्याने डावलण्यात आले. बहल यांना संधी मिळाली असती तर संपूर्ण राज्यभर राष्ट्रवादीकडून वेगळा संदेश जावू शकला असता. मात्र त्यांना राज्यपातळीवरील एखादे महामंडळ, विधानपरिषदेसाठी संधी पक्षाने न दिल्यामुळे आणखी किती दिवस पक्षाकडून टाळले जाणार असा प्रश्न बहल समर्थक विचारू लागले आहेत.
विधानसभेला पडल्यानंतर भाजप विधानपरिषदेला संधी देते हे समोर आल्याने माजी आमदार विलास लांडे यांचा विचार कधी होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. या नेत्यांबरोबरच सलग चारवेळा महापालिकेत निवडून आलेले व सध्याचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर संजोग वाघेरे, मंगला कदम, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादीतून बाहेर न पडता पक्षाशी प्रमाणिक राहण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शहरातील मातब्बर असलेल्या या नेत्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार विचार करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
तुलना तर होणारच!
येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला महापालिकेत पुन्हा सत्ता आणावयाची झाल्यास शहरातील प्रामाणिक आणि मातब्बर नेत्यांना संधी द्यावी लागणार आहे. पुणे शहरातील अनेकांना राष्ट्रवादीने संधी दिली मात्र पिंपरी-चिंचवडमधील नेत्यांना काय दिले हे शोधल्यानंतरही सापडणे मुश्किल आहे. त्यातच आता एका बाजूला भाजपकडून मिळणारे झुकते माप आणि राष्ट्रवादीकडून सातत्याने कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय याची तुलना येत्या महापालिका निवडणुकीच्या प्रचारात होणार हे मात्र नक्की आहे.