प्रसाद शेटे
शिवेंद्रराजेंचे गावागावात भेटीचे सत्रम्हसवे गणाच्या भूमिकेकडे लक्ष
म्हसवे गणातील राष्ट्रवादीचे पंचायत समिती सदस्या अरुणा शिर्के यांना सभापती निवडीवेळी झालेला अपमान म्हसवे गणातील मतदार अद्याप विसरलेले नाही. सभापती पदासाठी ओपन आरक्षण असताना जयश्री गिरी यांना सभापतीपद देऊन म्हसवेकरांच्या मनावर केलेल्या जखमा त्यांना अजूनही ज्ञात आहेत त्यामुळे त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा विचार करत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होतोय.
मेढा – आगामी विधानसभा लोकसभा निवडणुका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या असून भाजपचे कार्यकर्ते, नेते मतदारांना भेटण्यासाठी आणि पक्षाला विजयी करण्यासाठी जिवाचे रान करतं असताना दिसत आहे. दस्तुरखुद्द शिवेंद्रसिंहराजे तहान भूक हरपून गावागावातल्या प्रत्येक गल्लीगल्लीत मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहेत. मात्र, राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक पवार यांनी जावळीत दुर्लक्ष केले आहे.
राष्ट्रवादीचा अभेद्य बुरुज समजला जाणाऱ्या जावळी तालुक्यात राष्ट्रवादीची झालेली पडझड सावरायला राष्ट्रवादी अपयशी ठरू लागल्याचे सध्याचे चित्र आहे. जावळी तालुक्यात भाजपचा प्रचार धडाक्यात सुरू असून प्रत्येक गावात भेटीचे सत्र सुरु असून गल्लोगल्ली जाऊन स्वतः उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत तर दुसरीकडे राष्ट्रवादीने नवीन पदांची कार्यकारिणी जाहीर करणे गरजेचे होते. मात्र अशातही त्यांनी तुल्यबळ झालेल्या भाजपला आव्हान दिले आहे. मात्र शहरातील राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी भाजपच्या प्रचारात असल्यामुळे नक्की तालुक्यात राष्ट्रवादीचे नेते तरी कोण? असा प्रश्न मतदारांना पडत आहेत.
माजी शिक्षण सभापती अमित कदम यांनी शिवेंद्रराजेंना पाठिंबा जाहीर करत दीपक पवारांना धक्का दिला आहे. त्यामुळे शिवेंद्रराजेंना आणखी बळकटी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचा जावळी तालुक्यातील जनतेवर जरी प्रभाव असला तरी ते कोरेगावात सुरू असलेल्या “महायुध्दात’ व्यस्त आहेत. तर माथाडी कामगारांना अजून शिंदे साहेबांचा आदेश आला नसल्याचे सांगितले जात आहे.
तालुक्यात ज्ञानदेव रांजने हे शिवेंद्रराजेंचे कट्टर समर्थक समजले जाणारे राजेंच्या विजयासाठी जिवाचे राण करतं आहेत, तर राष्ट्रवादीचे प. स. उपसभापती दत्ता गावडेची भूमिका गुलदस्त्यात आहे. ते अजून कोणत्याही पक्षाच्या प्रचारात अथवा सभेत दिसून आले नाहीत. एकंदरीत तालुक्याचे राजकीय वातावरण पाहता भाजप वरचढ ठरू लागला आहे तर राष्ट्रवादीला विरोधकांसह पक्षातीलच नेत्यांचा सामना करावा लागत असल्याने राष्ट्रवादीचा प्रवास खडतर सुरु असल्याचे दिसत आहे.