मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विरोधकांनी तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत असून यामुळे भाजपच्या 12 आमदारांवर निलंबनाची कारवाई कऱण्यात आली आहे. यावरून आता राजकारण तापलं आहे. या निलंबनाची तक्रार करण्यासाठी भाजपचे 12 आमदार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार असल्याचं समजतं.
भाजपचे निलंबित 12 आमदार राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सभागृहातील वस्तूस्थिती सांगणार आहेत. तसेच ठाकरे सरकारच्या कारभाराची तक्रार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
ओबीसी मुद्द्यावर विरोधकांनी तालिका अध्यक्षांच्या दालनात जाऊन त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली. यामुळे तालिका अध्यक्ष संतापले. त्यांनी 12 आमदारांचे 1 वर्षासाठी निलंबन करण्याचा निर्णय घेतला. आता हे 12 आमदार सायंकाळी ६ वाजता राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत. याबाबत भाजप नेत्यांची बैठक झाली असून पुढील रणनिती ठरविण्यात आली आहे.
दरम्यान भाजपचे निलंबित आमदार आणि राज्यपाल भेटीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आमदार निलंबनाची स्टोरी आधीच तयार करण्यात आली होती, असा आरोप सरकारवर केला आहे.