मुंबई – राज्य सरकारनेच भाडे भरले असल्याचे केंद्र सरकारने न्यायालयात स्पष्ट केले आहे. यामुळे रेल्वेच्या भाड्याबाबत भाजपने सातत्याने मांडलेली भूमिका ही खोटारडी होती. आता तरी त्यांनी खोटे बोलणे थांबवावे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशभरातील स्थलांतरित मजुरांची उपेक्षा झाल्याचा आरोपही त्यांनी केला.
सचिन सावंत म्हणाले, भाजप नेत्यांनी रेल्वेच्या भाड्याबाबत मांडलेली भूमिका खोटी होती. केंद्र सरकारने न्यायालयात भाडे राज्याने दिल्याचे स्पष्ट केले आहे. आता भाजप नेते ते अनुदान असल्याचे म्हणत आहेत. मात्र, यावरून रेल्वेचे राजकारण केले जात असल्याचे उघड होते. केंद्राच्या अपयशामुळेच मजुरांचे हाल सुरू आहेत.
तसेच लॉकडाऊन हा करोना नियंत्रणावरील अंतिम उपाय नाही. लॉकडाऊनचा उपयोग हा करोना चाचण्या वाढवण्यासाठी आणि आरोग्यविषयक सोयी सुविधा वाढवण्यासाठी करायला हवा होता. पण केंद्र सरकारने तसे केले नाही. त्यामुळे अर्थचक्रही रुतून बसले असल्याचे त्यांनी नमूद केले.
जीडीपीने नीचांक गाठला
मोदी सरकारला सहा वर्षे झाले. आज देश करोनाच्या संकटात लोटला गेला त्याला फक्त मोदी सरकार कारणीभूत आहे. हेच मोदी सरकारचं मोठे अपयश आहे. मोदी त्यांच्या कामाचं कौतुक करण्यात गुंग आहेत. पण देश संकटाच्या दरीत लोटला गेला आहे. जीडीपी फक्त आताच कमी होईल, असे नाही.
याआधीही जीडीपीचे दर कायम खाली जात होते. करोनाचं संकट आता आले, पण मोदी सरकारच्या काळात आधीपासून जीडीपीचा हा दर कमी होत गेला. जीडीपीने गेल्या दशकातील नीचांक गाठला होता. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांची धोरणं जबाबदार आहेत, असेही ते म्हणाले.