नवी दिल्ली – झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेनंतर आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री किरण रिजिजू आणि आसामचे मंत्री हेमंत बिस्वा यांच्यानंतर आता केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी हेमंत सोरेन यांच्यावर निशाणा साधला आहे.
ही वेळ करोना विरुद्ध लढण्याची आहे. पंतप्रधान मोदींशी लढण्याची नाही, अशा शब्दात डॉ. हर्षवर्धन यांनी हेमंत सोरेन यांना सुनावलं आहे. त्याचबरोबर आपल्या सरकारचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी हेमंत सोरेन पंतप्रधान मोदींवर टीका करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
डॉ. हर्ष वर्धन यांनी ट्वीट करत हेमंत सोरेन यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन कदाचित आपल्या पदाची गरिमा विसरले आहेत. करोना महामारीच्या सध्यस्थितीवर बोलताना आणि पंतप्रधानांवर एखादं वक्तव्य करताना त्यांनी हे विसरू नये की, या महारामारीचा अंत सामूहिक प्रयत्नांनीच शक्य आहे. आपला नाकर्तेपणा झाकण्यासाठी पंतप्रधान मोदींवर बोलणे निंदनीय आहे, असे त्यांनी म्हटले आहे.