जिल्ह्यात 18 तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या लवकरच होणार रद्द
नगर (प्रतिनिधी) – भिन्न विचारांच्या शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांनी राज्यात सत्ता मिळवताना भाजपला सत्तेपासून वंचित ठेवले.आता बाजार समित्यांमधील असलेले भाजपचे नगण्य स्थानही खोडून काढण्यात आले आहे. भाजपने बाजार समित्यांवर नेमलेल्या तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अद्याप जिल्हा उपनिबंधकांकडे आदेश आला नसला तरी लवकरच या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द होणार आहे. जिल्ह्यात 14 पैकी आठ बाजार समित्यांमधील 18 तज्ञ संचालक घरी जाणार आहेत.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही सत्ताधाऱ्यांनी कुरघोडी केली आहे. हा निर्णय जरी संपूर्ण राज्यासाठी घेण्यात आला असला तरी त्याचा परिणाम नगर जिल्ह्यातील राजकारणावर मोठ्या प्रमाणात होईल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या या राष्ट्रवादी, कॉंग्रेसच्या ताब्यात आहेत. सहकारातील प्राबल्य वाढविण्यासाठी भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना राज्यातील सत्तेच्या माध्यमातून संधी दिली; परंतु राजकीयदृष्ट्या त्याचा लाभ भाजपला उठवता आला नाही.
गेल्या चार वर्षांच्या काळात बाजार समित्यांमध्ये भाजपला शिरकाव करता आलेला नाही. याउलट राष्ट्रवादीसोबत सत्तेवर असलेल्या शिवसेनेलाही सहकारात स्थान मिळविता आलेले नाही. आता शिवसेना यासाठी प्रयत्न करेल, अशी शक्यता आहे. राज्य शासनाने बाजार समित्यांमधील असलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 14 बाजार समित्यांमधील आठ बाजार समित्यांमध्ये तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या झाल्या होत्या. त्यात 18 संचालकांचे पद आता रद्द होणार आहे.
भाजप शासनाच्या काळामध्ये अधिनियमानुसार 13 जून 2015 रोजी बाजार समित्यांमध्ये तज्ञ संचालकांची नियुक्ती केली होती. बाजार समित्यांमध्ये असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या निर्विवाद सत्तेला चेक देण्यासाठी ही तरतूद करण्यात आली होती. साहजिकच बाजार समितीच्या कारभारावरसत्ताधारी भाजपचा वचक राहिला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय घेवून भाजपला बाजार समितीमधून बाहेर काढले आहे. जिल्ह्यात 14 बाजार समित्या आहे. परंतु त्यापैकी नगर, जामखेड, कोपरगाव, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, संगमनेर व कर्जत या आठ बाजार समित्यांमध्ये तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या झाल्या होत्या.
उर्वरित अकोले, शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, नेवासे व राहाता या ठिकाणी या नियुक्त्या झाल्या नाही. तेथील राजकीय गणिते व न्यायालयीन प्रक्रियेमुळे या नियुक्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे आता आठ बाजार समित्यांमधील तज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द होणार आहेत. बाजार समितीनिहाय तज्ञ संचालकांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. नगर- 4, जामखेड, कोपरगाव, पारनेर, राहुरी, श्रीगोंदा, संगमनेर, व कर्जत प्रत्येकी 2 असे 18 संचालकांचे पद रद्द होणार आहे.
भाजपने घेतलेल्या निर्णयांना हद्दपार करण्याचे राजकारण सत्ताधाऱ्यांनी सुरु केले आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात सहकार क्षेत्रातील निवडणुकांत व्यापकपणे सहभाग घेऊन राष्ट्रवादी, कॉंग्रेस या पक्षांना शह देण्यासाठी भाजप प्रयत्न करेल, असे चित्र आहे. शिवसेना तज्ज्ञ संचालक नेमणार का? मागील पाच वर्षांमध्ये भाजप, शिवसेना, रिपाइ यांच्या महाविकास आघाडीची राज्यात सत्ता होती. तेव्हा बाजार समित्यांमध्ये तज्ञ संचालक नेमताना केवळ भाजपच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली होती. आता हाच कित्ता शिवसेना गिरवणार? की तज्ज्ञ संचालकांची नियुक्ती कायमस्वरुपी रद्द करणार, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेली आहे.