नवी दिल्ली – देशभरामध्ये सध्या CAB व NRC कायदा लागू करण्याबाबत मोठा वाद उफाळून आला आहे. एकीकडे विरोधक या कायद्याचा प्रखर विरोध करीत आहेत तर दुसरीकडे CAB व NRC बाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण करून विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. अशातच आता राहुल गांधी यांनी आज सकाळी ट्विटरद्वारे पंतप्रधानांवर केलेल्या आरोपांना भाजपकडून चोख प्रतिउत्तर देण्यात आलं असून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी, ‘राहुल गांधी हे खोटारड्यांच्या टोळीचे म्होरक्या आहेत’ असा हल्ला चढवला आहे.
तत्पूर्वी, आज सकाळी राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटरखात्यावरून डीटेंशन सेंटरचा एक व्हिडीओ शेअर करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतील वक्तव्याला खोटं ठरवलं होतं. या व्हिडिओसोबतच त्यांनी, ‘संघाचे पंतप्रधान भारतमातेची फसवणूक करत आहेत’ असा संदेश देखील लिहिला होता. राहुल गांधींच्या या टीकेला प्रतिउत्तर देताना भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसप्रणित युपीए आघाडी सरकारच्या काळात आसाममध्ये ३ डीटेंशन सेंटर उभारले असल्याचा सरकारी दस्तावेज सादर करत राहुल गांधी हे खोटारड्यांचे म्होरक्या असल्याचं म्हंटल.