रायदिघी – पश्चिम बंगाल मध्ये निवडणुका जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून राज्यात धार्मिक तेढ निर्माण केली जात असल्याचा आरोप त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे. आज चोवीस परगणा जिल्ह्यात एका निवडणूक प्रचार सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला.
भारतीय जनता पक्षाने हैदराबाद मधील एका पक्षालाहाताशी धरून येथे उमेदवार उभे केले आहेत. त्यांच्या जाळ्यात सापडू नका असे आवाहनही ममतांनी केले आहे. असदुद्दीन औवेसी यांच्या एमआयएम पक्षाचे नाव न घेता त्यांनी हा आरोप केला. त्या म्हणाल्या की हिंदु आणि मुस्लिम यांच्यातील मतांच्या धृवीकरणासाठीच त्यांनी हे प्रयत्न चालवले आहेत. हिंदु मतदारांनी भारतीय जनता पक्षाकडूनही सावध राहावे आणि जातीय हिंसाचाराच्या प्रक्षोभापासून दूर राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
आपण स्वत: हिंदु आहोत, आणि रोज चंडी मंत्र म्हटल्याशिवाय आपण घराच्या बाहेर पडत नाही असे नमूद करून त्या म्हणाल्या की, मी माझ्या परंपरेचा मान राखते आणि अन्य धर्मियांचाहीं सन्मान करते. हीच आपली खरी शिकवणूक आहे त्याला निवडणुकीच्या राजकारणाचे गालबोट लावू देऊ नका असे आवाहनही ममतांनी केले.