मुंबई – मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले आहे. या मुंबई महापालिका निवडणूक यावेळी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात रंगणार असं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत महाविकास आघाडीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मेळाव्याला महाविकास आघाडीतील दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी भाजपवर कडाडून टीका केली.
खंडणी, ब्लॅकमेलिंग आणि किडनॅपींग करून भाजप पक्ष प्रगतीपथावर आहे. भाजप चांगल्या लोकांच्या मागे ईडी लावत आहे. भाजप शिवासेना सोबत इतके वर्ष होते. ज्यांचं बोट धरून तुम्ही महाराष्ट्रात आलात त्याच सेनेला हे संपवत होते. आता शिवसेना चांगल काम करत असताना भाजपने हिंदुत्वाचा मुद्दा काढला”, अशी घणाघाती टीका शेख यांनी केली.
नवी मुंबईसाठी काही तरी करायची गरज होती. पण भाजपने निव्वळ खायचं काम केले. येथील भूमीपुत्रांसाठी, मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवासाठी आम्ही नक्की निर्णय घेऊ. नवी मुंबईत बंदर कसे येईल यावर आम्ही कॅबिनेट मिटिंगमध्ये लवकरच निर्णय घेऊ”, असं आश्वासन शेख यांनी दिलं.
“गॅसचे भाव किती झाले? पेट्रोल-डिझेलचे दर किती वाढले? यावर का बोलत नाही, देश कसा चालेल? आज देश संकटात आहे. मात्र भाजपला त्याचे काही नाही. तुम्ही पक्ष बघू नका फक्त महाविकास आघाडी बघून मतदान करा”, असं आवाहन अस्लम शेख यांनी केलं.