एनडीएमधील समन्वय सुधारण्याचीही केली मागणी
नवी दिल्ली : भाजपचा जुना मित्रपक्ष असणाऱ्या पंजाबमधील शिरोमणी अकाली दलानेही आता देशभरात राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक (एनआरसी) लागू करण्याला तीव्र विरोध दर्शवला आहे. तसेच, भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधील समन्वय सुधारण्याची मागणीही त्या पक्षाने केली आहे.
कायद्यात रूपांतर होण्याआधी नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाला संसदेत जेडीयू आणि शिरोमणी अकाली दल या भाजपच्या मित्रपक्षांनी पाठिंबा दिला. मात्र, त्या कायद्याविरोधात देशभरात निदर्शने सुरू झाल्यानंतर त्या पक्षांनी एनआरसीला थेट विरोध दर्शवला आहे.
याआधी जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी त्यांच्या राज्यात एनआरसी लागू करणार नसल्याचे जाहीर केले. त्यानंतर शिरोमणी अकाली दलाने नागरिकत्व दुरूस्ती कायद्यात मुस्लिमांचाही समावेश करण्याची मागणी केली. त्या
वेळी त्या पक्षाने एनआरसीबाबत थेट काही बोलण्याचे टाळले होते. मात्र, राज्यसभेचे खासदार नरेश गुजराल यांनी गुरूवारी शिरोमणी अकाली दलाची भूमिका मांडताना एनआरसीला विरोध जाहीर केला. प्रस्तावित एनआरसीमुळे मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. कुठल्याच अल्पसंख्याक समाजाला असुरक्षित वाटू नये, असे ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले.
महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. त्यानंतर भाजप आणि शिरोमणी अकाली दलामधील संबंधही ताणले गेल्याची चर्चा आहे. त्याबाबत विचारल्यावर गुजराल यांनी एनडीएमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे संकेत अप्रत्यक्षपणे दिले.
एनडीएमध्ये कुठले मुद्दे असतील तर ते आम्ही अंतर्गत पातळीवर सोडवू. मात्र, वाजपेयी सरकारच्या काळात असायचा तसा समन्वय एनडीएच्या घटक पक्षांमध्ये असायला हवा. विशेषत: वादग्रस्त मुद्द्यांवर एनडीएमध्ये कुठली चर्चा न होण्याची बाब दुर्दैवी आहे, असे त्यांनी म्हटले.