नवी दिल्ली, दि. 22 – मुंबईचे पोलीस अधिकारी परमवीरसिंह यांनी गृहमंत्र्यांवर आरोप करणारे जे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे तो विषय आज भाजपच्या सदस्यांनी लोकसभेत लावून धरत त्यावर मोठाच गदारोळ केला.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणीही भाजपच्या सदस्यांनी यावेळी केली. गृहमंत्र्यांनी वाझे नावाच्या एका अधिकाऱ्याला शंभर कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप यात परमवीरसिंह यांनी केला होता. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी भाजपने केली.
भाजपने शून्य प्रहरात हा विषय उपस्थित करीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर जोरदार आरोप केले. त्या गदारोळाला व त्यांच्या आक्षेपाला शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी आक्षेप घेतला.
भाजपचे सदस्य राकेश सिंह म्हणाले की, हा एक गंभीर मामला असून तो केवळ एका राज्याचा विषय आहे म्हणून तो सोडून देता कामा नये त्याला राष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले आहे असे त्यांनी नमूद केले. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना आघाडीचे सरकार बेकायदेशीरपणे पैसा गोळा करीत असल्याचे यातून स्पष्ट होत असल्याने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याची गरज आहे.
भाजपचे दुसरे सदस्य म्हणाले की, केवळ परमवीरसिंह यांनीच नव्हे तर महाराष्ट्रातील अन्यही अधिकाऱ्यांनी अशी पत्रे पाठवली आहेत. तथापि शिवसेनेचे विनायक राऊत यांनी हे आरोप फेटाळून लावले.
ते म्हणाले की, राज्यात गेले चौदा महिने कार्यरत असलेले महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे कसोशीचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत. भाजपला राज्यात आपले सरकार स्थापन करण्याची घाई झाली आहे, असा आरोपही त्यांनी केला. परमवीरसिंह हे राज्यातील सर्वात भ्रष्ट अधिकारी आहेत, असा आरोपही त्यांनी केला.