बारामतीवर लक्ष केंद्रीत : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी रणनिती
सचिन खोत
पुणे – राज्यात आगामी काळातील स्थानिक निवडणुकांसह भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी सुरु केली आहे. भाजपने लोकसभा निवडणूक 2024 साठी “मिशन 45′ साठी बारामतीवर लक्ष केंद्रीत केले आहे. भाजपने सर्व रणनिती आखली आहे. मात्र, भाजपचे “बारामती मिशन’ हे आव्हानात्मक मानले जात आहे.
आगामी लोकसभा निवडणूक 2024 साठीची तयारी आणि रणनिती ठरविण्यासाठी मुंबईत राज्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक नुकतीच पार पडली. यात बारामतीचा समावेश आहे. त्यामुळे 2014 प्रमाणे पुन्हा भाजपकडून बारामती लक्ष्य होणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवार यांचा बालेकिल्ला आहे. या मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, भोर- वेल्हे, मुळशी, खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत. बारामतीचे नेतृत्व शरद पवार यांच्यानंतर तीन टर्म खासदार सुप्रिया सुळे हे करीत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघाकडे विरोधकांचे कधी फारसे लक्ष जात नव्हते. कारण हा मतदारसंघ पवार कुटुंबीयांना मानणारा आहे. मात्र, 2014 मधील लोकसभा निवडणुकीत हा मतदारसंघ राज्यात लक्षवेधी ठरला. त्यावेळी अच्छे दिन, मोदी लाटेत हा मतदारसंघ दोलायमान झाला होता.
परिवर्तनाचे वारे या मतदारसंघात वाहू लागले होते. रासपाचे महादेव जानकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात लढत दिली होती. सुरूवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक शेवटच्या टप्प्यात जानकर यांनी चुरशीची केली होती. त्यावेळी पवार कुटुंबीयांनी इंदापूर, भोर, पुरंदरचे बुरूज अभेद्य केले. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे 69 हजार मतांनी विजयी झाल्या. 2014 मधील निवडणूक पवार कुटुंबीयांसाठी पहिल्यांदाच अग्निपथाप्रमाणे ठरली. मात्र, त्यानंतर खासदार सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील बुरूजांची डागडुजी, बंदिस्ती केली. 2019 मध्ये भाजपने लोकसभा निवडणुकीत आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली होती. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी संघटन बांधणी, विकासकामांच्या जोरावर भाजपवर मात केली. या आठ वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. त्यामुळे बारामतीत भाजपाचे मिशन 45 हे आव्हानात्मक ठरणार आहे.
सहा मतदारसंघात प्रभावी संपर्क
खासदार सुळे यांनी 2014 पासून खऱ्या अर्थाने गाऊंड लेव्हलवर मोठा जनसंपर्क वाढविला आहे. गावागावांत कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे जबरदस्त नेटवर्क ही त्यांची जमेची बाजूची आहे. या सहा मतदारसंघात प्रभावी जनसंपर्क तयार केला आहे. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसच्या आमदारांशी समतोल साधला आहे. लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन आमदार आहेत. तसेच राष्ट्रवादीचा प्रभाव पुरंदर, भोर, मुळशी, दौंड, वेल्हे तालुक्यात आहे.
भाजपची दोन आमदारांवर भिस्त
बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला, दौंडमध्ये भाजपचे आमदार आहेत. भोर, पुरंदरमध्ये कॉंग्रेसचे आमदार आहेत. बारामती- इंदापुरात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. भाजपला मिशन 45 साठी दौंड, खडकवासला, इंदापूर वगळता इतर तालुक्यात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे इंदापुरात वर्चस्व आहे. बारामती, भोर, पुरंदर, वेल्हे, मुळशी तालुक्यात भाजपाचा प्रभाव कमी आहे. त्यात दौंडचा विचार केल्यास राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश थोरात यांचा गटही प्रबळ आहे. त्यामुळे राज्याच्या सत्ता परीघात असलेल्या राष्ट्रवादीला झुंज देण्यासाठी भाजपापुढे आव्हान आहे. राष्ट्रवादीचे गावपातळीवरील मजबूत संघटन आहे. यामुळे भाजपची रणनितीवर राजकीय वर्तृळात चर्चा आहे.