श्रीनगर – पुन्हा सत्ता मिळाल्यास जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 आणि कलम 35 ए रद्द करू अशी भूमिका सातत्याने घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने या विषयावर प्रत्यक्ष काश्मीरात मात्र मवाळ भूमिका घेतल्याचे आज दिसून आले. या कलमांविषयी बोलताना भाजपचे सरचिटणीस राम माधव म्हणाले की या बाबतीत केवळ संसदच निर्णय घेऊ शकेल. आम्ही त्यावर अधिक भाष्य करू इच्छित नाही असे ते म्हणाले.
काश्मीरच्या बाबतीत आम्ही अटलबिहारी वाजपेयी यांनी स्वीकारलेल्या मार्गावरूनच जाऊ इच्छितो. कलम 370 प्रकरणात भारतीय संसदेत जो सारासार विचार होऊन निर्णय होईल तो आम्ही स्वीकारू असे त्यांनी आज येथे बोलताना सांगितले. आमची यावरची भूमिका स्पष्ट आहे. पण संसदेत यावर जो काही निर्णय होईल तो पर्यंत आपण वाट पहिली पाहिजे असे ते म्हणाले. जम्मू काश्मीरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहींरनाम्यात कलम 370 आणि 35 ए रद्द करण्याची घोषणा केली आहे पण जम्मू काश्मीरातील पक्षांनी त्यांना या विषयाला हात लाऊनच दाखवा असा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर राममाधव यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर येथे थोडी मवाळ भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे.