अहमदनगर: अहमदनगर जिल्हा हा स्वातंत्र्याच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान दिलेला जिल्हा आहे. पण याठिकाणी भाजपाच्या वतीने दिल्या गेलेल्या उमेदवाराकडून नगर जिल्ह्याची प्रतिष्ठा उद्ध्वस्त होत असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते राहुरी येथील प्रचार सभेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, आम्ही एकदा चूक केली आणि यांना पाठिंबा दिला. पण यांचे खरे स्वरूप समजताच अशी प्रवृत्ती राजकारणात कुठे दिसता कामा नये, असा आग्रह आपल्याला करण्यासाठी मी इथे आलो आहे.
आज या राहुरीची परिस्थिती काय आहे? सत्तेचा गैरवापर करून लोकांना तुरुंगात टाकण्याचे काम सत्ताधारी करत आहेत. गेल्या निवडणुकीत आमदारांची शक्ती लोकांनी तुमच्या हाती दिली. पण या शक्तीचे सकारात्मक भान तुम्हाला नाही. अशी ही मंडळी आज मतं मागायला येत आहेत,त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली असल्याचे पवार म्हणाले.