मुंबई – भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांकडून जी जनआशीर्वाद यात्रा काढली जात आहे त्याला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे, त्यांनी म्हटले आहे की, ही यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेलाच आमंत्रण आहे.
आज येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की संपूर्ण देशात अजून करोना कायम असताना भाजपने संयम राखायला हवा होता. भाजप मुद्दाम हा प्रकार करीत आहे असा आरोपही त्यांनी केला. एका प्रश्नाला उत्तर देताना राऊत यांनी सांगितले की देशातील एका माध्यम संस्थेने देशातील पहिल्या पाच लोकप्रीय मुख्यमंत्र्यांची यादी जनमत चाचणी घेऊन प्रकाशित केली.
त्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा समावेश आहे. या जनमत चाचणीला भाजपचे लोक विरोध करीत असून ती चाचणी ते नाकारत आहेत. कारण या पाच जणांच्या यादीत भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही. भाजपच्या एकाहीं मुख्यमंत्र्याला या यादीत स्थान का मिळू नये असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
हाच जर निकाल भाजपच्या बाजुने गेला असता तर मात्र त्यांनी सर्वत्र ढोल वाजवून त्याचे स्वागत केले असते असेही ते म्हणाले. आम्ही मात्र या जनमत चाचणीचा निकाल साजरा करणार असून येत्या काही दिवसांत उद्धव ठाकरे हे देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरतील असे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी करोना काळात केलेल्या कामाची दखल न्यायालयांनीही घेतली आहे. त्यांनी शिक्षण, विकास, पायाभूत सुविधा आदि क्षेत्रात जे कार्य केले आहे त्याला संपूर्ण देशातून पसंती मिळत आहे असेही राऊत यांनी नमूद केले.