पुणे – इतिहासात प्रथमच खेड तालुक्याला निर्मला पानसरे यांच्या रुपाने जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मान देऊन राष्ट्रवादीने भाजपला शह देण्यासाठी एक राजकीय खेळी खेळली आहे. या राजकीय खेळीने खेड तालुक्यात भाजपच्या वाढत चाललेल्या प्रस्थाला “ब्रेक’ लागण्याची चिन्हे गडद झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. खेड तालुका सुरुवातीला राष्ट्रवादीला मानणारा होता.
मात्र, नंतरच्या काळात शिवसेनेने तालुक्यात जोरदार “एन्ट्री’ घेत राष्ट्रवादीला तोडीसतोड असा पक्ष म्हणून नावारुपाला आला. त्यामुळे निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असाच सामना रंगला होता. दोन्ही पक्षांनी स्थान बळकट करण्यासाठी एकमेकांवर “कुरघोडी’ करण्याची एकही संधी सोडली नाही. यात कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना यशस्वी होते, त्यामुळे तालुक्यातील जनतेला दोन पक्षांमधील राजकीय “द्वंद’ अनुभवायला मिळाले. मात्र, मध्यंतरीच्या काळात अतुल देशमुख नावाचा “हिरा’ भाजपला मिळाला अन् त्याने तालुक्यात भाजपचे “कमळ’ फुलवण्यासाठी मोठे कष्ट केले त्यात त्यांना यशही आले.
त्यातच शरद बुट्टे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने देशमुख यांच्या पाठीशी खंबीर अशी साथ मिळाली. जिल्हा परिषद निवडणुकीत अतुल देशमुख नायफड-वाशेरे जिल्हा परिषद गटातून, तर बुट्टे पाटील पिंपरी-पाईट जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. या दोघांनी तालुक्यात “कमळ’ फुलवण्यासाठी जे कष्ट घेतले त्याचे “फळ’ म्हणून देशमुख यांना तालुकाध्यक्ष तर बुट्टे पाटील यांना जिल्हा परिषदेचे “गटनेते’ पद देऊन त्यांचा योग्य तो सन्मान केला.
दोघांकडे मोठी जबाबदारी आल्याने तेही जोमाने कामाला लागले आणि त्यांनी राष्ट्रवादी, शिवसेना पक्षांना “शह’ देण्यासाठी राजकीय खेळी खेळल्या त्यात त्यांनी बऱ्याच अंशी यश मिळवल्याने “भाजप’चे तालुक्यात मोठे “प्रस्थ’ निर्माण झाले अन् त्यांना मानणारा मोठा वर्ग ही निर्माण झाला. तालुक्यात “कमळ’ फुलायला लागल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या पायाखालील वाळू सरकायला लागली.
राज्यात सुरुवातीपासून 2019 (अपवाद 2014ची विधानसभा निवडणूक) पर्यंत युती असतानाही तालुक्यात शिवसेना-भाजपचे सूत कधीच जुळले नाही, हे सर्वश्रुत आहे. तर 2019च्या लोकसभा निवडणुकीत “युती’ असतानाही माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना हवी तेवढी मदत भाजपच्या कार्यकर्त्यांकडून झाली नसल्याने आढळरावांचा पराभव झाला असा आरोप शिवसेनेने केला होता.
अतुल देशमुखांमुळे गोरेंचे स्वप्न धुळीस
2019च्या विधानसभा निवडणुकीत “युती’ असतानाही अतुल देशमुख यांनी “अपक्ष’ उमेदवार म्हणून सुरेश गोरे, दिलीप मोहिते पाटील यांच्या समोर आव्हान उभे केले. याचा फटका सुरेश गोरे यांना बसल्याने त्यांचे दुसऱ्यांदा निवडून येण्याचे “स्वप्न’ धुळीत मिळाले. तर तालुक्यातील जनतेने दिलीप मोहिते यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवत त्यांना निवडून दिले. तर अतुल देशमुख यांनी मिळवलेली मते ही वाखाण्याजोगी आहेत. त्यातच मुख्यमंत्री पदावरून शिवसेना-भाजपची युती संपुष्टात आली अन् राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्याने राज्यातील संपूर्ण राजकारणच बदलून गेले आहे.
एका दगडात मारले दोन पक्षी
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने खेड तालुक्याला इतिहासात प्रथम “लाल दिवा’ मिळेल अशी आशा होती. मात्र, सत्तेत तालुक्याला पुन्हा डावल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या मनात तालुक्याविषयी काही “तेढ’ आहे का? असा सवाल उपस्थित होत होता. त्यातच खेड तालुक्यात भाजपचा वारू रोखण्यासाठी आणि देशमुख आणि बुट्टे पाटील यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठीच निर्मला पानसरे यांना अध्यक्षपद देऊन राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणजेच शरद पवार आणि अजित पवार यांनी राजकीय खेळी करीत एका दगडात दोन पक्षी मारण्याची चाल खेळली आहे. पहिली म्हणजे मोठे पद न देण्याची कार्यकर्त्यांची ओरड “शांत’ झाली अन् भाजपला “लगाम’ लावण्याची “चाल’ यशस्वी होते का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.