हेमंत देसाई
गुजरात आणि मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानातही राज्यसभा निवडणुकांच्या आधी कॉंग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचून घेण्याची धडपड भाजप करत असल्याचा आरोप कॉंग्रेस करत आहे…
19 जून रोजी राजस्थानसह काही राज्यांत राज्यसभेच्या जागांसाठी निवडणुका आहेत. राजस्थानात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत असून, भाजप एका जागेवर जिंकू शकतो. परंतु त्याने आणखी एक उमेदवार निवडणुकीत उतरवला आहे. त्यालाही निवडून आणण्यासाठीच फोडाफोडी केली जात आहे आणि कर्नाटक व मध्य प्रदेशप्रमाणे राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी आमदारांना 25-25 कोटी रुपयांचे आमिष दाखवले जात असल्याची तक्रार कॉंग्रेसने पोलिसात तसेच निवडणूक आयोगाकडे केली आहे. मात्र त्याचवेळी कर्नाटकात भाजपमध्ये एक मोठी “इंटरेस्टिंग’ घडामोड घडली आहे.
कर्नाटकात राज्यसभेच्या निवडणुकीत शुक्रवारी चार उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. कॉंग्रेसकडून ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे उमेदवार होते. त्यांचे वय “अवघे 77 वर्षां’चे आहे! जनता दल सेक्युलरचे नेते व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हेदेखील राज्यसभेत जात आहेत. त्याचं वय तर “केवळ 87 वर्षे’ आहे. 1996 साली पंतप्रधान असताना ते राज्यसभेचेच सदस्य होते. देवेगौडा निवडून यावेत म्हणून भाजपने यावेळी राज्यसभेसाठी आपला तिसरा उमेदवार उभा केला नाही.
कर्नाटकातील ही सेक्युलर युती कशी आहे, बघा! देवेगौडा यांचे चिरंजीव कुमारस्वामी यांनी कॉंग्रेससमवेत संयुक्तपणे सरकार स्थापन केले, तेव्हा भाजपपासून देशाला धोका असल्याचे देवेगौडा यांचे ठाम मत होते. देशाला धोका निर्माण झाला, तरी स्वतःला धोका निर्माण होऊ नये, याची काळजी मात्र त्यांनी अवश्य घेतली आहे. भाजपने इरान्ना कडाडी आणि अशोक गस्ती या दोघाजणांना राज्यसभेत पाठवले आहे.
यातली विशेष गोष्ट म्हणजे, भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने प्रदेश भाजपने ज्या सदस्यांची नावे सुचवली होती, ती साफ नामंजूर केली. प्रभाकर कोरे, रमेश कट्टी आणि प्रकाश शेट्टी ही नावे प्रदेश भाजपने सुचवली होती. एवढे झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा म्हणाले की, सामान्य पक्ष कार्यकर्त्यांना तिकीट देऊन, भाजप श्रेष्ठींनी योग्यच निर्णय घेतला आहे. ही जणू आम्हाला भेटच मिळाली आहे.
कुठल्याही परिस्थितीत पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे, हा येडियुरप्पा यांचा ध्यास होता. त्यासाठी त्यांनी कुमारस्वामी यांच्या जेडीएस तसेच कॉंग्रेस पक्षात फोडाफोडी करून आणि फोडलेल्या आमदारांना भाजपच्या तिकिटांवर पुन्हा निवडून आणून, सरकार बनवले व स्थिर केले. आपल्या नावाचे स्पेलिंगही त्यांनी बदलले आणि कदाचित त्यामुळेच पुन:श्च मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न साकार झाले, अशी त्यांची अंधश्रद्धा असावी. मात्र भाजपचे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येडियुरप्पा यांचे महत्त्व कमी करण्याचे ठरवलेले दिसते. म्हणूनच राज्यसभा निवडणुकीकरिता येडियुरप्पा यांनी सुचवलेली नावे बाजूला करण्यात आली.
येडियुरप्पा यांनी सुचवलेल्या यादीत विद्यमान राज्यसभा सदस्य प्रकाश शेट्टी यांचे नाव होते. त्यांची मुदत संपत असून, ते मोठे हॉटेल व्यावसायिक आहेत. भाजपने राज्यसभेसाठी निवडलेले दोन उमेदवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. तसेच पक्षाचे सरचिटणीस (भाजप व संघ यांच्यातील दुवा म्हणून काम करणारे) बी. एल. संतोष यांच्या ते जवळचे आहेत. कॉंग्रेसप्रमाणेच भाजपमध्येही “हायकमांड कल्चर’ आहे, अशी टीका कर्नाटकातील भाजप वर्तुळातूनच केली जात आहे.
शहा आणि येडियुरप्पा यांचे संबंध फारसे बरे नाहीत, परंतु लोकसभा निवडणुकीत कर्नाटकात भाजपला 28 पैकी 25 जागा मिळाल्या. तसेच गेल्या डिसेंबरमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांत 15 पैकी 12 जागा भाजपला मिळाल्या. हे येडियुरप्पा यांचेच कर्तृत्व होते. गतवर्षी ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले. परंतु शहांप्रमाणेच संतोष हेही येडियुरप्पा यांच्या विरोधात आहेत, असे मानले जाते.
दोन वर्षांपूर्वी कर्नाटक विधानसभेच्या झालेल्या निवडणुकांत कॉंग्रेस व जेडीएसने भाजपला लोळवले होते. त्या सुमारास पक्षात अंतर्गत बंडाळीचे थैमान सुरू होते. या सर्व परिस्थितीस संतोष हेच जबाबदार असल्याचा जाहीर आरोप येडियुरप्पा यांनी केला होता. त्यावेळी ओबीसींचे एक मोठे नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी येडियुरप्पा यांच्या विरुद्ध बंड पुकारले आणि स्वतःची वेगळी आघाडी स्थापन केली. हे “बंडोबा’ही लवकरच “थंडोबा’ होऊन पक्षात परतले व आता ते भाजप सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.
दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीबाबत बर्नी सॅंडर्स या अमेरिकेतील नेत्यांनी टिप्पणी केली होती. त्याविरोधात ट्विट करताना, अमेरिकेच्या निवडणुकीत आम्ही हस्तक्षेप करू, असा इशारा याच संतोष यांनी त्यांना दिला होता. मागच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या नावावरून संतोष आणि येडियुरप्पा यांच्यात मतभेद निर्माण झाले होते. बंगळुरू दक्षिणेतून संतोष यांनी तेजस्वी सूर्या यांना तिकीट देण्याची मागणी केली. या तेजस्वीनेदेखील वादग्रस्त ट्विट्स केलेले आहेत.
उलट येडियुरप्पा यांनी दिवंगत केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या पत्नी तेजस्विनी यांच्या उमेदवारीची मागणी केली होती. परंतु अखेर संतोष यांचेच ऐकले गेले. येडियुरप्पा यांना घरी पाठवून त्यांच्या जागी संतोष यांना मुख्यमंत्रिपदी आणले जाईल, अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. वास्तविक येडियुरप्पा यांनी कर्नाटकात एकहाती भाजपची पक्षसंघटना रुजवली.
परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शहा यांना बलाढ्य प्रादेशिक नेते नको असावेत. 2011 साली भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून येडियुरप्पा यांना पक्षाने मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास सांगितले होते. परंतु त्यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची पाळी भाजपवर आली होती. आता येडियुरप्पा यांची गरज संपली असावी. त्यांच्याशिवाय देखील पक्षाचे व सरकारचे बरे चालेल, अशी “संतोषा’ची भावना श्रेष्ठींची असावी.