आम आदमी पक्षाचा आरोप
नवी दिल्ली – शाहीनबाग निदर्शनांमागे भाजपच असल्याचा आरोप दिल्लीतील सत्तारूढ आपने सोमवारी केला. त्या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या काही जणांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आधार आपने घेतला.
देशाची राजधानी दिल्लीतील शाहीनबाग परिसरात काही महिन्यांपूर्वी नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (का) विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. ते ठिकाण देशभरातील काविरोधी निदर्शनांचे केंद्रस्थान बनले. शाहीनबाग निदर्शनांत सहभागी झालेल्या काही मुस्लीम निदर्शकांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचा संदर्भ देऊन आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी शाहीनबाग निदर्शनांची पटकथा भाजपने लिहिल्याचा आरोप केला.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या प्रचाराच्या केंद्रस्थानी शाहीनबाग निदर्शनांचा मुद्दा होता. त्या निदर्शनांमुळे निर्माण झालेल्या वादंगाचा लाभ केवळ भाजपलाच मिळाला. त्या पक्षाच्या दिल्लीतील मतांचे प्रमाण 18 टक्क्यांवरून 38 टक्क्यांपर्यंत पोहचले, असे भारद्वाज यांनी पत्रकार परिषदेत म्हटले. दरम्यान, आपचा आरोप भाजपने फेटाळून लावला.
जगातील सर्वांत मोठा पक्ष असणारा भाजप सर्व धर्मांचे प्रतिनिधित्व करतो. जाती-धर्माच्या आधारे पक्ष भेदभाव करत नाही. मुस्लीम बंधू-भगिनींनाही भाजपबरोबर वाटचाल करायची असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते मनोज तिवारी यांनी दिली.