पाटणा – पूर्व भारतातील राज्यांत आणि विशेषत: पश्चिम बंगालमध्ये सरकार स्थापण्याचे स्वप्न भाजप पाहत आहे. मात्र, ते स्वप्न बिहारमध्येच भंगेल, असे भाकीत कॉंग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी गुरूवारी केले.
बिहार विधानसभा निवडणुकीतील कॉंग्रेसच्या प्रचारासाठी येथे आलेले पायलट पत्रकारांशी बोलत होते. बिहारमध्ये विरोधकांची महाआघाडी ऐतिहासिक विजय संपादन करेल. त्या निकालाचा परिणाम देशाच्या राजकारणावर होईल, असे म्हणत त्यांनी पुढील वर्षी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याचा संदर्भ दिला.
पायलट यांनी कधी भाजपशी फाटाफूट, तर कधी युती करण्यावरून बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. बिहारमधील मागील निवडणूक भाजप आणि नितीश यांच्या जेडीयूने एकमेकांविरोधात लढवली.
त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीश यांच्या डीएनएबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. टीका करणाऱ्या भाजपबरोबर आता नितीश यांनी हातमिळवणी केली आहे. सत्तेत राहण्यासाठी काहीही करू शकणारी व्यक्ती बिहारचे भले करू शकत नाही, असे पायलट म्हणाले.