लखनौ – उत्तरप्रदेशात भाजपने आपले राजकीय वर्चस्व पुन्हा सिद्ध केले. भाजपने मित्रपक्षांसह 75 पैकी 67 जिल्हा पंचायतींची अध्यक्षपदे खिशात घातली. मात्र, भाजपने बळाचा वापर करून तो विजय मिळवल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे.
उत्तरप्रदेशातील 75 पैकी 22 जिल्हा पंचायतींच्या अध्यक्षांची बिनविरोध निवड मंगळवारी जाहीर करण्यात आली.
त्यातील 21 अध्यक्ष भाजपचे होते. त्यानंतर 53 अध्यक्षपदांसाठी शनिवारी निवडणूक झाली. अध्यक्षांच्या निवडीसाठी जिल्हा पंचायतींच्या सदस्यांनी मतदान केले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले. त्या निकालाच्या आधारे आणखी 46 जागा जिंकल्याचा दावा भाजप आणि मित्रपक्षांनी केला.
पुढील वर्षी उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा निकाल भाजपचे मनोबल वाढवणारा ठरणार आहे.
दरम्यान, निकालानंतर अखिलेश यांनी भाजपला लक्ष्य केले. आधी झालेल्या जिल्हा पंचायत सदस्यांच्या निवडणुकांत समाजवादी पक्षाने लक्षणीय यश मिळवले. मात्र, अध्यक्षपदांच्या निवडणुकीत भाजपने अनेक मतदारांचे अपहरण केले. बळाचा वापर करून काहींना मतदानापासून रोखले, असा आरोप त्यांनी केला.