मुंबई : आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतल्यानंतर आता मेट्रो कारशेडच्या जागेवरुन राजकारण होत असल्याचे पुढे येत आहे. केंद्राकडून या जागेवर दावा केल्याने कांजूरमधील मेट्रो कारशेडच्या जागेबाबत वाद निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, मेट्रोचं काम थांबवण्यासाठीच भाजपकडून कटकारस्थान सुरु असल्याचा गंभीर आरोप अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
https://www.facebook.com/217046208635092/posts/1381499022189799/
मंत्री नवाब मलिक यांनी यासंदर्भात ट्विट करताना म्हटले आहे की, “केंद्राच्या इंडस्ट्री मंत्रालय खात्याकडून राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र दिले आहे. पत्रात मेट्रो कारशेडची जागा राज्यसरकारने एमएमआरडीएला वर्ग केली ती जागा मिठागरांसाठी आहे आणि आता कारशेडला दिलेली जागा चुकीच्या पद्धतीने देण्यात आली” असे पत्रात म्हटले आहे.
पुढे ते म्हणतात की, “याआधी मिठागराच्या बर्याचशा जागा राज्यसरकारला केंद्राने २००२ साली वर्ग केल्या आहेत.भाजपचे लोक सुरुवातीला ही खाजगी जागा आहे सांगत होते आणि आता केंद्र सरकारच्या मालकीची आहे असे सांगत आहेत यावरुन भाजपच्या लोकांना मेट्रोच्या कामात अडथळा आणायचा आहे व भाजपकडून कटकारस्थान सुरू आहे”, असा गंभीर आरोप कारशेडवरुन मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर केला आहे.
दरम्यान, मेट्रो कारशेडसाठी आरेच्या जागेला पर्याय म्हणून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कांजूरमार्गच्या जागेची घोषणा केली. परंतु आता या जागेवर केंद्र सरकारने दावा केल्याचं वृत्त आहे. ही जागा आपल्या मालकीची असून ती एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याचा निर्णय रद्द करण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारला केली आहे. केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे मेट्रो कारशेडच्या जागेवरुन केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष होण्याची शक्यता आहे.