मुंबई – शिवसेनेचे बडे नेते आणि उद्धव ठाकरेंचे विश्वासू मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनी बंड उभारत राज्याचं राजकारण हादरवून सोडलं आहे. बंड उभारल्यानंतर शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे सैनिक असल्याचं सांगताना शिवसेना सोडली नसून सोडणारही नसल्याचं स्पष्टपणे सांगितलं होत. शिंदे यांना संख्याबळ जमवण्यात यश आल्यास ते भाजपसोबत सत्ता स्थापन करतील असा अंदाज राजकीय जाणकारांनी ववर्तवला आहे. मात्र शिवसेना सोडणार नाही असं ठासून सांगणाऱ्या शिंदे यांच्यासमोर भाजपने अडचणीत टाकणारी अट ठेवली असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या ट्विटर खात्यावर एक ट्विट करत याबाबतचा दावा केला आहे. आंबेडकर यांनी, “एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे?” असा दावा केला आहे. आंबेडकर यांनी या ट्विटची मांडणी प्रश्नार्थक स्वरूपात केली असली तरी हा त्यांचा शिंदे व भाजप दरम्यान होत असलेल्या वाटाघाटींबाबतचा दावा मनाला जातोय.
दरम्यान, आंबेडकर यांचा दावा जर योग्य असेल तर एकनाथ शिंदे बंडाच्या सुरुवातीपासूनच मांडत असलेल्या ‘अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार’ या भूमिकेचे काय होणार हा प्रश्न निर्माण होतोय. शिंदे यांना एकीकडे सेनेच्या आमदारांचा पाठिंबा वाढत असतानाच दुसरीकडे सेनेचे खासदारही आता शिंदे गटात सामील होत असल्याचं दिसतंय. भाजपकडून शिंदे यांना राज्य मंत्रिमंडळात तसेच केंद्रीय मंत्रिमंडळात योग्य स्थान देण्यात येईल असा प्रस्ताव देखील देण्यात आल्याचे समजते.
शिंदे हे भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन करतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र बंडखोर सेना आमदारांना भाजपसोबत सत्ता स्थापन केल्यास शिंदे गट म्हणून स्वतंत्र अस्तित्व देण्यात येते की या गटाने भाजपमध्ये प्रवेश करावा असा आग्रह भाजपकडून केला जातो याबाबत शंका-कुशंका व्यक्त करण्यात येत आहेत.
अशातच महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्वाचे नेते असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी सेना आमदारांना भाजपने विलीनीकरणाची अट घातली असल्याचा दावा केल्याने याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणाऱ्या गटाने भाजपमध्ये विलीन व्हावे आणि मगच सरकार स्थापन होईल अशी अट भाजपने एकनाथ शिंदेंना घातली आहे ?
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) June 23, 2022