बेंगळुरू – कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी कर्नाटक येथील नुकत्याच झालेल्या प्रचार सभेत कर्नाटकची प्रतिष्ठा, सार्वभौमत्व किंवा अखंडतेला आम्ही कोणालाही धोका निर्माण करू देणार नाही असे विधान केले होते. त्या विधानाला भाजपने आक्षेप घेतला आहे. त्यांनी या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून सोनिया गांधींच्या विरोधात गुन्हा नोंदवला जावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
सोनिया गांधी यांचे हे विधान धक्कादायक आणि अस्वीकार्य आहे असे भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री शोभा करंदलजे यांनी म्हटले आहे. या वक्तव्याची निवडणूक आयोगाने योग्य दखल घेतली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे. कॉंग्रेसने मात्र सोनिया यांच्या या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले आहे. एका ट्विटर संदेशात कॉंग्रेसनेम्हटले आहे की सोनिया गांधी यांनी साडे सहा कोटी कन्नडिगांना एक मजबूत संदेश दिला आहे. दरम्यान भाजपने सोनियांच्या या वक्तव्याला आक्षेप घेतला असला तरी त्या बाबतची नेमकी कारणमिमांसा मात्र त्यांनी दिलेली नाही.
दरम्यान भाजपचे नेते अनुराग ठाकूर यांनी आक्षेपाच्या संबंधात विवरण देताना म्हटले आहे की सोनिया गांधी यांच्या भाषणात सार्वभौमत्व हा शब्द प्रयोग खटणारा आहे. कर्नाटकचे विभाजन करण्याचा त्यांचा डाव आहे असे यातून ध्वनीत होते आहे. केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने आज निवडणूक आयोगाची भेट घेऊन त्यांच्याकडे या विषयी तक्रार दाखल केली.
धर्मेंद्र प्रधान म्हणाले की सोनिया गांधी यांनी सार्वभौम शब्दाचा जाणिवपुर्वक उल्लेख केला असून त्यांचा अजेंड तुकडे-तुकडे गॅंगचा आहे. भारताला कमजोर करण्याचा त्यांचा अजेंडा आहे असेही त्यांनी म्हटल आहे.भाजपचे नेते तरूण चुघ यांनी कॉंग्रेस पक्षाची राजकीय नोंदणीच रद्द करण्याची मागणी केली आहे.