जयपूर – राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Chief Minister Ashok Gehlot) यांच्या समर्थक आमदारांचे राजीनामे मंजूर करण्याची मागणी मंगळवारी भाजपने केली. त्यामागे राजस्थानमध्ये सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसची कोंडी करण्याची खेळी असल्याचे मानले जात आहे.
गेहलोत यांना कॉंग्रेसचे अध्यक्ष बनवण्याची पक्षश्रेष्ठींची इच्छा होती. त्यामुळे अध्यक्षपदाच्या निवडणुकीला सामोरे जाण्याआधी गेहलोत यांचा उत्तराधिकारी निवडण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरवले. त्यातून काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित केले जाणार होते. मात्र, गेहलोत यांचे समर्थक असणाऱ्या अनेक आमदारांनी पाठ फिरवल्याने ती बैठक झालीच नाही. गेहलोत यांनी मुख्यमंत्रिपदी कायम रहावे यासाठी एकप्रकारे कॉंग्रेस आमदारांनी बंडाचे निशाण फडकावले. त्या आमदारांनी विधानसभेचे सभापती सी.पी.जोशी यांच्याकडे राजीनामे सादर केल्याचेही जाहीर केले.
गेहलोत समर्थक आमदारांनी घेतलेल्या पवित्र्यामुळे राजस्थानविषयी कॉंग्रेसपुढे मोठा पेच निर्माण झाला. तूर्त तरी पक्षश्रेष्ठींनी राजस्थानमध्ये जैसे थे स्थिती कायम ठेवली आहे. मात्र, तेथील पेचामुळे गेहलोत यांना पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
राजस्थानमध्ये कॉंग्रेस नेतृत्वबदल करणार की नाही याविषयीचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. अशात कॉंग्रेसची कोंडी करण्यासाठी भाजप पुढे सरसावला आहे.
भाजपच्या राजस्थानमधील नेत्यांच्या शिष्टमंडळाने जोशी यांची भेट घेऊन कॉंग्रेस आमदारांचे राजीनामे मंजूर करण्याची मागणी केली. त्या भेटीनंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी भाजपची भूमिका मांडली. कॉंग्रेसच्या 91 आमदारांनी राजीनामे दिले. तीन आठवडे उलटले तरी त्या राजीनाम्यांवर विचार झालेला नाही. राजीनामे मंजूर झाले नाहीत तर कॉंग्रेस आमदारांनी ते मागे घ्यावेत. मात्र, तसे करताना कॉंग्रेस आमदारांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, असे त्यांनी म्हटले.