मुंबई: “ऑपरेशन लोटस’ नव्हे, भाजपचे वर्तनच “कोरोना व्हायरस’पेक्षाही भयंकर आहे. पण त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, अशा शब्दात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी टीका केली. मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ सरकार उलथवण्यासाठी भाजपने सत्ताधाऱ्यांचे आठ आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप कॉंग्रेस नेत्यांनी केला आहे.
अशोक चव्हाण म्हणाले, मला वाटतं “ऑपरेशन लोटस’ आता नित्याचाच भाग झालेला आहे. आम्हा सर्वांना याची सवय झालेली आहे. जे-जे पक्ष लोकशाहीला मानणारे आहेत. ते कधीही “ऑपरेशन लोटस’ला यशस्वी होऊ देणार नाहीत. देशात लोकशाही मार्गानेच सरकार चालली पाहिजेत, मग ती कोणाचीही असू देत, असे मत त्यांनी व्यक्त केले.
ज्या ठिकाणी भाजपचं सरकार नाही, तिथले आमदार फोडण्याचा प्रयत्न असतो. कमलनाथ सक्षम मुख्यमंत्री आहेत. मध्य प्रदेशात कॉंग्रेसच्या सरकारला कोणताही धोका नाही, असा विश्वासही त्यांनी बोलून दाखवला.
ऑपरेशन लोटसला खतपाणी घातलं जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ऑपरेशन लोटस म्हणण्यापेक्षा भाजप म्हणजे करोना व्हायरसपेक्षा कठीण वर्तन करत आहे. त्यामुळे दक्षता घेतली पाहिजे. त्यावर अँटीबायोटिक शोधण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे, असा टोलाही त्यांनी लगाविला.