जयपुर – भारतीय जनता पक्षाने राजस्थानातील सरकार पाडण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले असून आता तर त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारही पाडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत अशी माहिती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दिली आहे. गेहलोत हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते असून त्यांनी दिलेल्या माहितीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, खुद्द अमित शहा यांच्याच वतीने ही सुत्रे हलवली जात असून त्यांनी राजस्थानातील काही आमदारांसमवेत या संबंधात बैठकही घेतल्याचे आमच्या कानावर आहे. सिरोही जिल्हतील कॉंग्रेस कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की आम्ही पाच सरकारे पाडली आहेत राजस्थानातील सरकार सहावे असेल असे भाजपचे नेते सांगत आहेत. त्यांच्या महाराष्ट्राविषयीही हालचाली सुरू आहेत अशी माहितीही त्यांनी दिली.
मात्र त्या विषयी त्यांना नेमकी काय माहिती मिळाली याचा तपशील मात्र त्यांनी दिला नाही. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींबाबत त्यांनी आज प्रथमच हे भाष्य केले आहे. राजस्थानातील सरकार पाडण्याचा प्रयत्न भाजपकडून पुन्हा सुरू झाला असल्याची माहिती त्यांनी या आधीही दिली होती.