कोपरगाव -करोना महामारीच्या संकटात राज्याचे महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्याबद्दल हातात वाडगे,केंद्राकडे बोट, निर्णयात मात्र तुझ्याच खोट, अंगण हेच रणांगण अशा निषेधाचे फलक हाती धरत सामाजिक अंतराचे नियम पाळत कोपरगाव शहर व तालुका भाजपाच्या वतीने माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी निषेध आंदोलन केले.
याप्रसंगी भाजपाचे प्रांतिक सदस्य रवींद्र बोरावके, तालुका अध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष कैलास खैरे, वैभव आढाव आदी उपस्थित होते. माजी आमदार कोल्हे म्हणाल्या, करोना संकटात बारा बलुतेदार अडचणीत सापडला, शेतकरी हवालदिल झाला, प्रत्येक घटक अडचणीत आला, श्रमिक रस्त्यावर मैलोन मैल पायी चालत गेले. अन्य राज्यांनी कोवीडसाठी विशेष पॅकेज दिले, पण महाराष्ट्र शासनाने काहीच जाहीर केले नाही उलट केंद्र शासनाकडे बोट दाखवत जबाबदारी झटकली. त्यांना जाब विचारण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंगण हेच रणांगण निषेध आंदोलन भाजपचे वतीने हाती घेतले असे कोल्हे यांनी शेवटी सांगितले.