चंदीगड -केवळ राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडेच पंजाबची शेती आणि उद्योग विकसित करण्याचा दृष्टिकोन आहे आणि या राज्याला अन्य कोणत्याही पोकळ आश्वासनांची गरज नाही असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. लुधियाना आणि फतेहगढ साहिब संसदीय मतदारसंघातील विधानसभा क्षेत्रांसाठी आज पंतप्रधानांची व्हर्च्युअल सभा आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले की, भाजप आणि एनडीएचे मित्रपक्ष नेहमीच शीख परंपरांसोबत उभे राहिले आहेत. यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर शीख हत्याकांडाचा पुन्हा आरोप केला.
मोदी म्हणाले की, कॉंग्रेस कर्तारपूर (साहेब) हे पवित्र ठिकाण भारतात ठेवू शकली नाही. मात्र, कर्तारपूरचा मार्ग आम्ही खुला केला. पंजाबला प्रत्येक स्तरावर आधुनिकीकरणाची गरज आहे, जे कॉंग्रेसच्या क्षमतेच्या पलीकडे आहे, असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी आम आदमी पक्षावरही निशाणा साधला ते म्हणाले की, त्यांना दिल्लीचे झोपडपट्टीमध्ये रूपांतरित करायचे आहे, त्यांच्या हातात पंजाबची सूत्रे देणे हिताचे होणार नाही. काही लोकांसाठी पंजाब हे केवळ सत्तेचे साधन आहे, असे ते म्हणाले आणि ज्या पक्षांनी अनेक दशके राज्यात सत्ता गाजवली त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले?असा सवालही त्यांनी केला.पंजाबच्या शेतकऱ्यांना कर्जापासून, नापीक जमिनीपासून, पिण्याच्या पाण्याच्या समस्येपासून मुक्त करण्यासाठी या पक्षांकडे कोणताही रोडमॅप नाही, असा दावाही पंतप्रधानांनी केला. पंजाबमधील शेतकऱ्यांना बियाणे, बाजारपेठ, कोल्ड स्टोरेज, फूड पार्क आणि अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी आधुनिक सुविधांची गरज आहे, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची निर्यात करण्यासाठी सर्वोत्तम कनेक्टिव्हिटीची गरज आहे. आमचे डबल इंजिन सरकार या सर्व क्षेत्रात वेगाने काम करेल असे आश्वासन त्यांनी दिले. पंजाब हे सीमावर्ती राज्य आहे. या राज्यातील सीमेजवळील भागांचा विकास करण्यासाठी सीमा क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली जाईल आणि येत्या पाच वर्षात राज्यातील फक्त पायाभूत सुविधांवर भरीव खर्च केला जाईल असे मोदी म्हणाले.