पुणे -कसबा विधानसभा मतदारसंघात स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी भाजपचे इच्छुक तयारीला लागले आहेत. एका इच्छुकाने महापालिकेतून ना हरकत प्रमाणपत्रांसाठी अर्जही करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भाजपकडून अद्याप या मतदारसंघातून टिळक यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी देणार की इतर कोणाला याबाबत अद्याप निर्णय झाला नसला तरी इच्छुक कोणताही धोका पत्करण्यास तयार नसल्याचे यावरून दिसून येत आहे. दरम्यान, टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनीही मुक्ता टिळक यांची मतदारसंघातील कामे पूर्ण करण्यासाठी घरातील सदस्यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
आमदार टिळक यांचे मागील महिन्यात निधन झाले. त्यानंतर लगेचच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कसबा विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे. कॉंग्रेसनेही निवडणूक लढविणार असल्याचे सांगत, ही निवडणूक बिनविरोध होऊ देणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपलाही निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे. अशातच कसबा हा भाजपचा पारंपरिक मतदारसंघ असून, या मतदारसंघात ब्राम्हण उमेदवाराला संधी द्यावी तसेच मुक्ता टिळक यांच्या कुटुंबात त्यांचे पती शैलेश अथवा मुलगा कुणाल यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरत असतानाच या मतदारसंघातील भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी गणेश बिडकर, धीरज घाटे, हेमंत रासने हे देखील या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. मात्र, पक्षाकडून 27 जानेवारीपर्यंत कोणताही निर्णय जाहीर केला जाणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजप कोणाला संधी देणार हे गुलदस्तात असले तरी काही इच्छुकांकडून आयत्या वेळी उमेदवारी मिळाल्यास अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळण्यास वेळ कमी असल्याने महापालिकेकडे मिळकतकर तसेच इतर कोणत्या प्रकारची थकबाकी नसल्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज करण्यात आले आहेत.
टिळक कुटुंबात उमेदवारी द्या – शैलेश टिळक
स्वर्गीय आमदार मुक्ता टिळक या 20 वर्षे नगरसेवक होत्या. त्यानंतर त्यांना आमदारपदाचे काम तीन वर्षे करता आले. त्यामुळे त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी टिळक कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळावी, अशी मागणी शैलेश टिळक यांनी केली आहे. त्याबाबत आम्ही पक्षश्रेष्ठींना विनंती केली असून, त्यांनी घेतलेला कोणताही निर्णय आमच्यासाठी अंतिम असणार असल्याचेही टिळक यांनी सांगितले. तसेच त्यांच्याकडून जो निर्णय घेतला जाईल तो योग्य असेल असा आमच्या कुटुंबाला विश्वास असल्याचेही ते म्हणाले.