बारामतीच्या उमेदवारीचा निर्णय मोदी, शहा, नड्डा घेतील
बारामती – देशात अनेक गड उध्वस्त झाले आहेत. गड कोणाच्या एकाच्या मालकीचा राहत नाही हा देशाचा इतिहास आहे. पवारांचा गड 2024 ला भाजपाने जिंकलेला दिसेल, अशी गर्जना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बारामती मतदारसंघात भाजपा रणनीती आखत असून त्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे दोन दिवसीय बारामती दौऱ्यावर आहेत. ६ सप्टेंबरला सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार राहूल कुल, आमदार गोपिचंद पडळकर, वासुदेव काळे, बाळासाहेब गावडे, अविनाश मोटे, दिलीप खैरे, पांडूरंग कचरे, सतीश फाळके आदींची उपस्थिती होती. बावनकुळे म्हणाले, देशात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वात विरोधी पक्षाची मोट बांधली जात असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, पवार यांचा तो अधिकार आहे. प्रत्येकाला आपले संघटन वाढविण्याचा अधिकार असतो.
परंतु राज्यात राष्ट्रवादीचा इतिहास पाहिला तर आठ जागांच्या वर हा पक्ष गेलेला नाही. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विश्वगुरु म्हणून ओळखले जातात. जगातील १५५ देशांनी त्यांचे नेतृत्व मान्य केले आहे. २१ व्या शतकातील मजबूत भारत बनविण्याचे व्हिजन त्यांच्याकडे आहे. विरोधकांकडे फक्त राजकीय व्हिजन आहे. त्यातून त्यांना आपापली दुकाने चालवायची आहेत. परंतु मोदी हे देशासाठी काम करत आहेत. जो राष्ट्रासाठी काम करतो. त्यांच्या मागे जनता राहते.
बारामतीच्या दौऱ्याची सुरुवात पवारांच्या काटेवाडी गावापासून सुरु करत असल्याबद्दल विचारले असता बावनकुळे म्हणाले, प्रत्येक बुथवर पदाधिकाऱ्याना ताकद मिळाली पाहिजे, यासाठी काटेवाडीत जात आहे. दिवसभरात अनेकांना भेटणार असून जनतेची निवेदने स्विकारून ती सरकारकडे पाठवणार आहे. बारामतीत प्रत्येकाला यावंसं वाटत, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, सुळे काय म्हणाल्या हे मला माहिती नाही. परंतु केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण बारामती दौऱ्यावर येत आहेत.
या दौऱ्यात खासदार म्हणून सुळे त्यांना भेटू शकतात. बारामतीसह राज्यातील सर्व जागांवर आम्ही लढणार आहोत. आमची संघटना वाढवणे, ताकद वाढविणे, उमेदवार निवडून आणणे ही पक्षाची जबाबदारी आहे. आमचा पक्ष जगातील व देशातील क्रमांक एकचा पक्ष आहे. त्यामुळे बारामतीची जागा जिंकायची हा आमचा निश्चय आहे. त्यामुळे आम्ही कोणाविरुद्ध लढतोय हा अजेंडा नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना व भाजप बारामतीची जागा कोणत्याही स्थितीत निवडून आणेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची वारंवार प्रशंसा करत असताना बारामती टार्गेट का, या प्रश्नावर ते म्हणाले, एखाद्याने चांगले काम केले तर त्यांची प्रशंसा करण्यात गैर काय. परंतु बारामती मतदारसंघात अजूनही ४५ टक्के जनता उपेक्षित आहे. ओबीसी, मराठा, धनगर समाजाचे प्रश्न कायम आहेत. चार-दोन लोक मोठे झाले म्हणजे समाज मोठा होत नाही. उपेक्षित एकत्र आल्यावर संघर्ष निर्माण होतो.आणि हा संघर्ष विजयापर्यंत घेवून जातो. ते काम आम्ही करू, देशातील अनेक गड उद्धवस्त झाले.बारामतीत कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे घेतील. जेथे आपण कमजोर असतो. तेथे अगोदरपासून तयारी करावी लागते. बारामतीसह देशातील ४०० पेक्षा अधिक लोकसभेच्या जागा आम्ही जिंकू. बारामतीचा उमेदवार केंद्रीय नेतृत्व ठरवेल. परंतु आजवर झाली नाही अशी फाईट २०२४ मध्ये येथे पाहायला मिळेल असे बावनकुळे म्हणाले.