भाजप नेते आशिष शेलार यांची माहिती
मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नाही तोपर्यंत आता राज्यातील महापालिकेच्या महापौरपदासाठी चुरस सुरू झाली आहे. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवार देणार नसल्याचे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. आमच्याकडे बहुमताचा आकडा नाही आणि महापौरपदासाठी कोणत्याही विरोधी पक्षाशी आघाडी करण्याची आमची इच्छा नाही, असेही आशिष शेलार म्हणाले. पण त्याचवेळी 2022 मधील निवडणुकीनंतर पक्षाकडे स्वतःच्या बळावर बहुमत असेल, असेही त्यांनी सूचक वक्तव्य केले.
BJP leader Ashish Shelar: BJP will not contest Mumbai Mayor elections as it doesn’t have the numbers. BJP doesn’t want to have an alliance with any opposition party. In 2022, the party will have the numbers on its own. (file pic) pic.twitter.com/UFvMAmN4z4
— ANI (@ANI) November 18, 2019
गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. शिवसेनेला राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर काढण्याचा निर्णय भाजपने रविवारी जाहीर केला. त्याआधी शिवसेनेचे केंद्रातील एकमेव मंत्री अरविंद सावंत यांनीही आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपची युती आहे. महापौरपद हे शिवसेनेकडे आहे. पण आता राज्यातील परिस्थितीमुळे मुंबई महापालिकेत भाजप काय भूमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. त्यातच मुंबई महापालिकेतील कॉंग्रेसच्या एका नगरसेवकाने भाजपने आम्हाला महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितले असल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजप महापालिकेत कॉंग्रेसला मदत करणार का, अशी चर्चा सुरू झाली होती. पण आशिष शेलार यांच्या विधानामुळे तूर्त त्याला पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्रीपदावरून शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून, त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण झाली आहे. राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेची बोलणी सुरू आहेत.