नागपूर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला केला आहे. पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना झालेल्या अटकेबाबत भाष्य केले आहे. देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. असा निशाणा पवार यांनी भाजपवर लगावला आहे.
देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्त गेल्यावर असं घडतं. pic.twitter.com/1mm6ttvjVl
— Sharad Pawar (@PawarSpeaks) November 17, 2021
शरद पवार म्हणाले की, राज्यातील सरकार आपल्या हातून गेलं म्हणून काही करता येत नाही. त्यामुळे अशाप्रकारे त्रास देणे, अटक करणे, बदनामी करणे हे काम केंद्र सरकारकडून केले जात आहे. तुम्ही कितीही छापे मारा आज ना उद्या ही सगळी शक्ती सामान्य माणसांचा पाठिंबा घेऊन कधीही तुम्हाला राज्यात सत्तेत येऊ देणार नाही.
देशमुखांना जेलमध्ये टाकलं त्याची किंमत आज ना उद्या वसूल झाल्याशिवाय राहणार नाही. राज्य चालवायचे असते ते दिलदारपणे. सत्तेचा वापर करायचा सन्मानाने. सत्ता आली की पाय जमिनीवर ठेवायचे. मात्र ज्यांचे पाय जमिनीवर राहात नाहीत व सत्ता डोक्यात जाते त्यांच्या हातून सत्ता गेल्यावर असं घडतं. असा जोरदार हल्ला पवार यांनी भाजपवर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा लहान-थोर कार्यकर्ता त्याचा विचार कधीच सोडणार नाही आणि जेव्हा संधी मिळेल तेव्हा व्याजासकट या लोकांना अक्कल शिकवल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे.
आज तेल, घासलेट, पेट्रोल, गॅसच्या किमती प्रचंड वाढल्यात. गरीब आणि सामान्य माणसाच्या हिताच्या गोष्टींचा आदर करण्याची भूमिका या केंद्र सरकारची नाही. त्यामुळेच लोकांना यातना कशा दिल्या जातील ही भूमिका ते घेत असतात. असेही पवार म्हणाले आहेत.
उत्तर प्रदेश येथील लखीमपुर खीरी येथे तब्बल एक वर्ष होऊनही तिथला शेतकरी लढा देतोय. मात्र जो देशाच्या भूकेचा प्रश्न सोडवतो त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी दिल्लीतील सरकारला वेळ नाही. तिथे ७०-८० वर्षांचा शेतकरी आंदोलनाला बसतो. आया-बहिणी तिथे सगळ्यांचे जेवण करतात. तीच गोष्ट हरियाणा, राजस्थान, उ. प्रदेश याठिकाणी आहे. शेतकरी, कामगार, सामान्य माणूस या सगळ्यांच्या यातना केंद्र सरकार वाढवत आहे. अशा लोकांना धडा शिकवण्याचे काम आता करायला हवे.
इथे येताना अनिल देशमुख सोबत नसल्याने कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवायचा ही चिंता मला होती. मात्र आल्यापासून हेच पाहतो आहे की सत्तेचा कितीही वापर केला तरी आमचा कार्यकर्ता घाबरणारा नाही. पक्षाच्या मागे हा कार्यकर्ता तितक्याच मजबुतीने आणि ताकदीने उभा राहतो आहे याची प्रचीती मला आली. असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला आहे.