पुणे – राज्यात आपल्याशिवाय, कोणताही पक्ष टिकू नये असे भाजपला वाटते. हिंदुत्त्वाची मते विभागली न जाता केवळ आपल्याकडे असावी, हेच भाजपचे सूत्र असून त्याच सुत्राचा वापर करून मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेलाही संपवून टाकेल, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पाटील म्हणाले, राज्यात भाजपची प्रतिमा मलीन झाली असून सर्व मार्गांचा अवलंब करून सत्ता टिकविणारा भ्रष्ट राजकीय पक्ष म्हणून ओळखला जाईल.
आत्मविश्वास ढासळला असल्याने, जनाधार नसल्यानेच इतर पक्षांचे आमदार फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, राज्यातील जनता फोडाफोडीच्या राजकारणाला थारा देणार नाही. कमकुवत असलेले, पराभवाच्या भीतीने ग्रासलेले नेते पक्ष सोडून जात असल्याचे सांगत, पक्षातून भाजपच्या गोटात जाणाऱ्या आमदारांचा समाचार पाटील यांनी घेतला. तर भाजपकडून मला पाच वर्षांपासून पक्षात येण्याची ऑफर होती. मात्र, माझ्या शरीरात जोपर्यंत प्राण आहेत, तोपर्यंत शरद पवारांना सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.