बारामती – बारामती नगरपरिषद आगामी निवडणूक भाजपा पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. केवळ विरोधासाठी नाही तर जिंकण्यासाठी लढाई असेल, असा निर्धार जिल्हा सरचिटणीस अविनाश मोटे यांनी व्यक्त केला आहे.
बारामती नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीबाबतची रणनीती ठरवण्यासाठी शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी बारामती नगरपरिषद निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
मोटे म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेसने नागरिकांना वेठीस धरून खोटे विकासाचे मॉडेल उभे केले आहे. नीरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणामुळे बारामतीकरांचे हाल होणार आहे. माळावरच्या देवी शेजारी जमिनीमध्ये दलदल निर्माण होऊ नये म्हणून तेवढ्याच भाग अस्तरीकरण केले असता तेवढ्याच चर्चा झाली असती. अस्तरीकरणामुळे एक किलोमीटर परिसरात पाणी मिळणार नाही.
जीवन प्राधिकरणाची पाणीपुरवठा क्षमता नसल्याने पाणी कनेक्शन मिळणार नाही. केलेले डांबरीकरण उकरून ड्रेनेजचे काम सुरू आहे. नगरपालिका केवळ एक व्यक्ती चालवत आहे. नगरसेवक देखील त्या व्यक्तीवर नाराज आहेत. प्रभागात चाललेल्या कामाची देखील नगरसेवकांना माहिती नसते. सर्व्हिस रोडचा काही जणांना मोबदला मिळाला नाही.
पांडुरंग कचरे म्हणाले की, स्वच्छतेचा डांगोरा पिटला जातो. मात्र, स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानामध्ये बारामतीला शून्य मार्क मिळाले आहेत. वैद्यकीय महाविद्यालय, कृषी महाविद्यालय केंद्र, बारामती विमानतळ, वयोश्री योजना केंद्र सरकारच्या पैशातून चालवत आहे. मात्र, राष्ट्रवादी त्याचे श्रेय घेत आहेत. ही वस्तुस्थिती सर्वांना माहीत आहे त्यामुळे बारामतीचा विकास म्हणजे भ्रमाचा भोपळा आहे. त्याचा फायदा भाजपला निवडणुकीत नक्कीच होईल.
सतीश फाळके म्हणाले की, सध्या शहरात जनतेच्या पैशाचा अपव्यय सुरू आहे. नीरा डावा कालवावर बांधण्यात आलेला पूर उद्घाटनापूर्वी पाडण्यात आला आहे. त्याबाबतची लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. करोनाच्या काळात मदत न मिळाल्याने व्यापारी तसेच गाळेधारक यांच्यात असंतोष आहे. यावेळी भाजप नेते दिलीप खैरे, सुधाकर पांढरे, गोविंद देवकाते, ऍड, प्रमोद माने, शहाजी कदम आदी उपस्थित होते.