नगरची जागा भाजपसाठी मागणार
नगर – गेल्या 25 वर्षात नगर शहरात अनिल राठोड यांनी केवळ द्वेषाचे व भावनेचे राजकारण केले आहे. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. एकही विकासाचे काम झाले नाही, नवीन कंपन्या आल्या नाहीत. उलट येथील कंपन्या अन्य गेल्या आहेत. आता नगरकरांना बदल हवा असून शिवसेनेकडे असलेली नगरची जागा त्यामुळेच भाजपकडे देण्याची मागणी करणार असल्याची माहिती भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष दिलीप गांधी यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शुक्रवारी नगर जिल्ह्यात येत असून सांयकाळी पाच वाजता शहरातून रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. त्याची माहिती देण्यासाठी गांधी यांनी पत्रकार परिषदेत बोलविली होती. ते म्हणाले की, त्यांना दिलीप गांधी चालत नाही. तर मग आम्हालाही ते नकोत. मित्रपक्ष म्हणून कसे बोलावे याचे साधे तारम्यही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे राठोड यांच्या उमेदवारीला विरोध असून नगरची जागा भाजपला देवून शिवसेनेला अन्य दुसरीकडील जागा देण्याची मागणी पक्षश्रेष्ठींकडे करणार असल्याचे गांधी म्हणाले.
भाजपकडून सात ते आठजण निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. कोणाला उमेदवारी द्यायची त्याचा निर्णय वरिष्ठ घेतील, मात्र आधी ही जागा भाजपलाच घेण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार आहेत. मात्र युती म्हणून अनिल राठोड यांना उमेदवारी देणार असाल तर त्याला पहिला आमचा विरोध राहील. असे ते म्हणाले.