हरियाणातील निवडणुकीनंतर संघाने व्यक्त केली चिंता
नवी दिल्ली : हरियाणातील जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपला दिलेला कौल हा भ्रमनिरास करणारा ठरला. हरियाणात खट्टर सरकारला 45 जागा मॅजिक फिगरचा आकडा गाठण्यात अपयश आले. परिणामी भाजपला जननायक जनता पार्टी (जेजेपी) या नवख्या पक्षासोबत समझोता करुन सरकार स्थापन करण्याची वेळ आली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने भाजपला सावधानतेचा इशारा दिला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ(आरएसएस) ने आपले मुखपत्र ‘पांचजन्य’च्या माध्यमातून भाजपला सल्ला दिला आहे.
‘हरियाणातील जनतेचा भाजपाला इशारा’ या शिर्षकाखाली लिहिलेल्या लेखातून राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने आपली भूमिका मांडली आहे. हरियाणातील जनता सरकारच्या कारभारावर समाधानी नाही. जो कौल मिळाला आहे त्याने जनतेने भाजपला नाकारलेले देखील नाही. पण हा जनादेश भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. जनतेने भाजपला एका अर्थाने इशारा दिला आहे, असे राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने म्हटले आहे.
लोकसभेत मिळालेला ऐतिहासिक विजयानंतर हरियाणामध्ये अशी परिस्थिती का निर्माण झाली? असा प्रश्न उपस्थित करत खट्टर यांच्या नेतृत्वावर देखील आक्षेप घेतला आहे. खट्टर यांचा अनुभवाची उणीव भाजपला महागात पडली असा उल्लेख या लेखात करण्यात आला आहे. विरोधकाला कधीच कमजोर समजायचे नसते, अशा शब्दांत संघाने भाजपच्या आत्मविश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.